दोन महिन्यांपूर्वी लल्लन जाधव याने पैलवान विक्रम वाघमारे याच्यावर खुनी हल्ला केला होता. अगदी सिनेमा स्टाइल पाठलाग करून त्याच्यावर वार करण्यात आले होते.
खेड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशननंतर अवघ्या काही तासांच्या आत लल्लन जाधवने (Lallan Jadhav) प्रतापसिंहनगरमध्ये राडा करत दहशत माजविली होती. ही गोष्ट जिव्हारी लागलेल्या पोलिस दलाने महसूल प्रशासनाच्या (Revenue Department) साथीने काल पहाटेपासून प्रतापसिंहनगरमधील दहशतीवर बुलडोझर चालविला. या वेळी जेसीबी व ब्रेकरच्या साह्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या संशयित गुन्हेगारांची तब्बल ११ मिळकतींवरील १६ जणांची पक्की घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतापसिंहनगरमध्ये (Pratap Singh Nagar) दत्ता जाधव गॅंगची (Datta Jadhav Gang) दहशत आहे. पोलिसांनी अनेकदा ही दहशत मोडण्याचा प्रयत्न केला; परंतु कालांतराने पुन्हा ही गॅंग डोके वर काढत आली आहे. औद्योगिक वसाहतीमधील भंगार चोरी, मटका अशा गुन्ह्यांनंतर या गॅंगने आपला मोर्चा परिसरात नव्याने निर्माण होणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे वळविला होता. दत्ताला शेअर दिल्याशिवाय कोणतेही बांधकाम सुरळीतपणे होत नव्हते. या उचापती वाढल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप पाटील याच्या काळात त्याच्यावर मोका लावण्यात आला. तत्पूर्वी त्याच्या गॅंगने पोलिस पथकावरही जीवघेणा हल्ला केला होता. गेल्या सहा वर्षांपासून मोकाच्या विविध गुन्ह्यांमध्ये दत्ता जाधव व त्याचा भाऊ युवराज जाधव कारागृहात आहेत; परंतु दत्ताचा मुलगा लल्लन जाधव याच्या उचापत्या प्रतापसिंहनगरामध्ये सुरूच होत्या.
बाहेरील जिल्ह्यातून मोलमजुरीसाठी आलेली कुटुंबे मुख्य बस स्थानकासमोर हजेरी माळावरील मोकळ्या जागेत पाल टाकून वास्तव्य करत होती. ७० च्या दशकात प्रतापसिंह महाराजांच्या प्रयत्नाने या कुटुंबांना खेडच्या हद्दीतील माळावरील शासकीय जागेत वसविण्यात आले होते. तेव्हापासून ही कुटुंबे या ठिकाणी राहात आहेत. खेड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत तीन वॉर्ड या परिसरातून येतात. विविध शासकीय योजना, तसेच स्वखर्चाने त्यांनी या ठिकाणी घरे बांधली. काहींनी मोकळ्या शासकीय जागेत अतिक्रमण करूनही घरे बांधून या परिसरात वास्तव्य केले आहे. या वसाहतीला प्रतापसिंह महाराजांच्या नावावरून प्रतापसिंहनगर असे नामकरण करण्यात आले. दत्ता जाधवची गॅंग सक्रिय झाल्यानंतर या परिसराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला.
दोन महिन्यांपूर्वी लल्लन जाधव याने पैलवान विक्रम वाघमारे याच्यावर खुनी हल्ला केला होता. अगदी सिनेमा स्टाइल पाठलाग करून त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते, तरीही तो नगरात वास्तव्याला होता. मागील आठवड्यात त्याने साथीदारांसह प्रतापसिंहनगरमधील एका घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तिच्या कुटुंबीयांना मारहाण करत साहित्याची मोडतोड केली होती. त्यानंतर घराबाहेर लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. या घटनेपूर्वी काही तास अगोदरच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतापसिंहनगरमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबविले होते. त्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांवर असणाऱ्या दबावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातून पोलिस दलाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत होते. त्यामुळे ही गोष्ट पोलिसांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती.
लल्लनच्या हल्ल्यानंतर पोलिस दल चांगलेच ॲक्टिव्ह झाले होते. महसूलच्या साथीने या दहशतीचा बीमोड करायचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. त्यातून २१ मार्चला खेडच्या मंडलाधिकाऱ्यांनी, तसेच गटविकास अधिकारी यांनी प्रतापसिंहनगर येथील मुलकीपड जमिनीची पाहणी केली. या पाहणीमध्ये संबंधित जागेवर रहिवासी व वाणिज्य कारणासाठी बांधकाम केल्याचे आढळून आले. तसा अहवाल त्यांनी तहसीलदारांना पाठविला. या अहवालाच्या आधारे तहसीलदारांनी त्याच दिवशी महसूल संहितेच्या कलम ५० चे उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाल्याने या जमिनीवरील बांधकाम पाडणे किंवा जमिनीचा वापर थांबविण्याबाबतची नोटीस गुन्ह्याशी संबंधित असलेल्या संशयितांच्या घरी पाठविली. मंगळवारपर्यंत (ता. २६) हे बांधकाम पाडण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले होते. तसे न केल्यास बांधकाम काढण्याची कार्यवाही शासकीय यंत्रणेमार्फत केली जाईल, तसेच त्याच्या खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले होते. एकूण १६ जणांना या नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.
तहसीलदारांनी दिलेली मुदत संपल्यानंतर अत्यंत गोपनीयपणे आज पहाटे सहाला पोलिस व महसूल विभागाचे पथक प्रतापसिंहनगरमध्ये दाखल झाले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी असा सुमारे शंभर ते दीडशे जणांचा पोलिसांचा ताफा होता, तसेच महसूल विभाग व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे ५० जणांचाही त्यात समावेश होता. त्यांच्यासोबत जेसीबी, ब्रेकर व अन्य वाहने होती. पोलिसांनी संपूर्ण प्रतापसिंहनगरला वेढा घातला होता. तिकडे जाणाऱ्या रस्ते बॅरिकेट टाकून अडविण्यात आले होते.
कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. काहींनी विनंती केल्यानंतर त्यांना साहित्य बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित घराचे विजेचे कनेक्शन तोडली. परिसरात वीज घालवली. त्यानंतर पक्क्या, सिमेंट काँक्रिटच्या बांधकामांना जेसीबी व ब्रेकर लावण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत दत्ता जाधव, त्याचा भाऊ युवराज जाधव याच्यासह १६ जणांची घरे जमीनदोस्त करण्यात आली.
पहाटेपासून कारवाई सुरू झाल्याने घरे पाडली गेलेले नागरिक पडलेल्या घरासमोर बसून होते. त्यांनीही माध्यमांसमोर काही प्रश्न उपस्थित केले. २१ तारखेला सायंकाळी आम्हाला नोटीस दिली. त्यानंतर सलग शासकीय सुट्या होत्या. आम्हाला न्यायालयातही जाता आले नाही. एका नोटिशीवर एवढी मोठी कारवाई करून आम्हाला बेघर का केले, आमचे म्हणणे मांडण्याची संधी का दिली नाही, कित्येक पिढ्या आम्ही इथं वास्तव्य करतोय, आता अचानक आमच्या डोक्यावरचे छपर का काढले, मुले दोषी असतील, तर त्यांच्यावर पाहिजे ती कारवाई करा, आम्हा म्हाताऱ्यांना शिक्षा का, माझी मुलगी एक महिन्याची बाळंतीण आहे, तिला कुठे ठेवायचे.
या परिसरातील सर्वांनीच आमच्याप्रमाणे घरे बांधली आहेत. मग आमचीच बेकायदेशीर कशी, शेजारीची घरे तशीच आहेत, मधले आमचेच का पाडले, शासकीय योजनेतून आम्हाला घर बांधायला आर्थिक मदत मिळाली, तेव्हा आम्ही बेकायदेशीर नव्हतो, अचानक कसे झाले. शासकीय निधीत घर होत नाही म्हणून बचत गटाचे कर्ज घेऊन घर बांधली, कचरा गोळा करून, मजुरी करून आम्ही ते कर्ज फेडतोय आता डोक्यावरचे छप्पर गेल्याने कर्ज कशी फेडायची असे प्रश्न ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित करत होत्या.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी अशाच प्रकारे गुन्हेगारांची घरे जेसीबीच्या साह्याने तोडण्याचे काम केले होते. गुन्हेगारांवर दहशत बसविण्यासाठी अशा कारवाया केल्याचे बोलले जात होते. त्या वेळी त्यांना बुलडोझर बाबा अशी उपाधी काहींनी दिली होती. तशाच पद्धतीने आज प्रतापसिंहनगरमध्ये पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. त्यामुळे साताऱ्यात बुलडोझर बाबाची चर्चा सुरू होती.
अजय ऊर्फ लल्लन दत्तात्रय जाधव, अनिता दत्तात्रय जाधव, दत्तात्रय रामचंद्र जाधव, मधुरमा दत्तात्रय जाधव, विजय ऊर्फ बबल्या जाधव, युवराज रामचंद्र जाधव, सागर खुडे, मच्छिंद्र ऊर्फ टकल्या भगवान बोराटे, राजू नवनाथ लोमटे, ऋषिकेश ऊर्फ डोंगुल्या नाना कांबळे, ऋतिक लक्ष्मण उकिर्डे, रोहन लक्ष्मण उर्किडे, सुनील सुखदेव वाघमारे, विलास रमेश खुडे, दत्ता काशिनाथ आसवरे, ओमकार भरत देडे.
या परिसरात संबंधितांची गुंडागर्दी, दहशत माजवण्याचे प्रकार सुरू होते. अवैध धंदे, सर्वसामान्यांना लुबाडण्याचे धंदे यांच्याकडून सुरू होते. सावकारी व अवैध मार्गाने सर्वसामान्यांकडून मिळवलेल्या संपत्तीतून त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधली होती. ती काढण्यासाठी त्यांना महसूल प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत बांधकाम काढून न घेतल्याने शासकीय बंदोबस्तात आज ही कारवाई करण्यात आली.
-समीर शेख, पोलिस अधीक्षक, सातारा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.