सध्या पावसाळा सुरू असून, डोंगर, दुर्गम भागात असलेल्या गावांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
सातारा : भूस्खलनाचा धोका असलेल्या जिल्ह्यातील ४१ गावांचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यापैकी १५ गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापैकी पाटण तालुक्यातील (Patan Taluka) आठ व सातारा तालुक्यातील एका गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे.
४९९ कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी साडेनऊ हेक्टर जागेचा वापर केला जाणार असून, एमएमआरडीएकडून हे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १५ गावांचे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ९६ गावांचा सर्व्हे होणार आहे.
त्यामध्ये भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन होणार आहे. मागील वर्षी पावसाळ्यात पाटण, वाई, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शासनाने सर्वच ठिकाणी धोकादायक गावांचा सर्व्हे केला होता. त्यामध्ये १४० गावे धोकादायक असल्याचे समोर आले होते.
पहिल्या टप्प्यात ४१ गावांचा सर्व्हे झाला. त्यातील १५ गावांचे तातडीने पुनर्वसनाचा निर्णय झाला. त्यामध्ये पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी या सात गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. यासाठी मुख्यमंत्र्यांनी चार कोटींचा निधी उपलब्ध केला होता.
त्यामध्ये पाटणमधील सात व सातारा तालुक्यातील एक (भैरवगड) असे आठ गावांचा पुनर्वसनाचे काम सुरू आहे. या गावांतील लोकांना घरे बांधून दिली जाणार आहेत. यानंतर जिल्ह्यातील डोंगरी भाग असलेल्या सर्वच तालुक्यांतील भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांचा सर्व्हे करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाटण व सातारा तालुक्यातील गावांचे पुनर्वसन होत आहे.
त्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील पाच, जावळीतील एक वाई तालुक्यातील दोन गावांच्या पुनर्वसनाबाबतची कार्यवाही होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ९६ गावांचा सर्व्हे होणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्षात स्थलांतरणाची गरज असलेल्या गावांचेच पुनर्वसन होणार आहे. सध्या भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.
सध्या पावसाळा सुरू असून, डोंगर, दुर्गम भागात असलेल्या गावांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे अशा गावांनी भूस्खलन होतंय का? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा गावांत जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष देणे व नागरिकांना सतर्क ठेवणे गरजेचे आहे, तरच संभाव्य धोका टाळता येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.