माण-खटावसारख्या भागात भरती इच्छुकांची संख्या मोठी आहे. सध्या सर्वत्र पोलिस भरतीची धूम सुरू आहे.
दहिवडी : पोलिस खात्यात भरती (Police Recruitment) होण्यासाठी अनेक तरुण तळपत्या उन्हात रक्ताचे पाणी व जिवाचे रान करत आहेत. मात्र, पोलिस भरतीचा पेपर फुटणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्यापासून या तरुणांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. या पेपर फुटीची पाळेमुळे माण ते मंत्रालयापर्यंत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पेपर फुटल्यास मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्तालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी कमांडोने दिला आहे.
माण-खटावसारख्या भागात भरती इच्छुकांची संख्या मोठी आहे. सध्या सर्वत्र पोलिस भरतीची धूम सुरू आहे. बहुतेक सर्वच जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते मुंबई शहर पोलिस भरतीकडे. तब्बल ७०७६ इतक्या जागा याठिकाणी उपलब्ध आहेत. या जागांसाठी पाच लाखांपेक्षा जास्त जणांनी मैदानी चाचणी दिली होती. यातील जवळपास ८० हजार जण लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
७ मे रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांना शोधून त्यांना पास करण्याचे आमिष दाखविणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे. माण, खटाव व फलटणमधील हे दलाल आठ लाख रुपये द्या व अंतिम प्रश्नपत्रिकेतील ९८ गुणांचे प्रश्न मिळवा, अशी खुली ऑफर देत आहेत. ही ऑफर स्वीकारणाऱ्यांकडून प्रथम सर्व मूळ कागदपत्र ताब्यात घेण्यात येत आहेत. त्यानंतर परीक्षेपूर्वी शंभरपैकी ९८ गुणांचे प्रश्न दिले जाण्याची हमी दिली जात आहे.
निवड झाल्यानंतर पैसे घेऊन मूळ कागदपत्र परत दिली जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील साधारण दीडशे जणांनी दलालांकडे कागदपत्र सुपूर्द केल्याची माहिती मिळत आहे. ज्या पद्धतीने खुलेआम दलाल पैशाची मागणी करत आहेत. ते पाहता या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची व मोठा राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हे शक्यच नाही असे बोलले जात आहे.
दहिवडीत भरती पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सहा ॲकॅडमी आहेत. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले एक हजारपेक्षा जास्त तरुण, तरुणी भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे दलालांचा येथे वावर आहे. सातारा भरतीत आम्ही अमुक एवढ्यांना पास केले, असे सांगणारे दलाल असल्याचे समजते.
मी देशसेवेसाठी जिवाची बाजी लावली होती. सेवानिवृत्तीनंतर माण-खटावसह दुष्काळी भागातील गरजू व होतकरू तरुण, तरुणींना भरती पूर्व प्रशिक्षण देत आहे. भरतीसाठी मी व माझे प्रशिक्षणार्थी मेहनत घेत आहोत. अशा स्थितीत जर पेपर फुटीसारखी दुर्दैवी घटना घडून योग्य तरुणांवर अन्याय झाला तर मी मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहन करेन.
-सुनील काटकर, सेवानिवृत्त कमांडो, संस्थापक, स्वराज करिअर ॲकॅडमी, दहिवडी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.