सातार : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर झालेल्या वादळाने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे अवघा जिल्हा गारठला आहे. या वातावरणाचा परिणाम फळबागांवर काही प्रमाणात होणार आहे. शेतकरी मात्र, रब्बीसाठी कमी दाबाच्या पट्ट्याने का होईना पाऊस पडावा, अशी अपेक्षा करत आहेत.
आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर मिचाँग चक्रीवादळाचा फटका बसला. तेथे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. जनजीवन विस्कळित झाले. मिचाँग चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. या पट्ट्याचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले आहे. त्याच्याच परिणामाने आपल्या विभागात सध्या पावसाळी वातावरण तयार झाले आहे. गेले दोन ते तीन दिवस सातत्याने ढगाळ वातावरण होत आहे.
काल रात्रीपासून त्यामध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी तर कोणत्याही क्षणी पावसाचे वातावरण होते. त्यामुळे हवेत दिवसभर गारठा होता. दुपारी दीड वाजताही हा गारठा कमालीचा जाणवत होता.दरम्यान, सध्या रब्बीचा हंगाम आहे. पावसाअभावी पेरण्या जास्त होऊ शकल्या नाहीत. काही प्रमाणात गहू, हरभरा, ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. या पिकांसाठी सध्या पावसाची आवश्यकता आहे. कमी दाबाच्या पट्ट्याने का होईना पाऊस पडू द्या, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
स्ट्रॉबेरी, द्राक्षांना फटका?
ढगाळ वातावरणाचा परिणाम फळबागांवर होण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राने व्यक्त केली आहे. आंब्यांना मोहर येण्यासाठी थंडी आवश्यक असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे मोहर येण्यावरही परिणाम होतो. उलट पालवी फुटते. तसेच धुके पडले तर स्ट्रॉबेरीला फळकुजीला सामोरे जावे लागते. स्ट्रॉबेरीची पाने आणि फळांवर बुरशी वाढते. त्यावर फवारणी केल्यास फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. द्राक्षांवर या ढगाळ वातावरणामुळे भुरी डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते, अशी माहिती देण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.