या शेतकर्‍यांसाठी आली आनंदाची बातमी : सेझसाठी संपादित जमिनी वगळल्या

एमआयडीसी
एमआयडीसी

खंडाळा (जि. सातारा) : या आदेशात खंडाळा तालुक्‍यात औद्योगीक क्षेत्र (सेझ) टप्पा तीनसाठी भूसंपादित होणारे सहा गावांतील 787 गटांतील 961 हेक्‍टर 79 आर क्षेत्र औद्योगिक क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक तीनमध्ये शेतकऱ्यांच्या बागायती व जिरायती जमिनी औद्योगिक प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येऊ नयेत, यासाठी खंडाळा तालुका शेतकरी कृती समिती व शेतकरी संघटना गेली चार वर्ष संघर्ष करत आहे. 

2010 मध्ये तालुक्‍यातील सात गावांच्या सुमारे 4500 एकर जमिनीवर शिक्के मारले. विशेष म्हणजे त्यानंतर मधल्या काळात शेतकरी वगळता केवळ गुंतवणूकदारांच्या जमिनींचे शिक्के निघाले, तसेच आजपर्यंत औद्योगिकीकरण व कॅनॉल, महामार्ग रुंदीकरण यासाठी अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी मुकाट्याने जमिनी दिल्या. मात्र त्यांचा परतावा, मोबदला व रोजगार न मिळाल्याची बाब लक्षात आल्यानंतर एमआयडीसी प्रकल्प, कृष्णा खोरे व महसूल विभागांकडे न्याय मागणीसाठी येथील शेतकरी कृती समितीच्या वतीने ता. नऊ ऑगस्ट 2016 रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण झाले.

त्या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे, नितीन बानगुडे पाटील व आमदार मकरंद पाटील यांच्यासह अनेकांच्या उपोषणस्थळावरील भेटीत आश्‍वासने दिली गेली; पण नंतर समाधानकारक तोडगा झाला नाही. त्यानंतर मंत्रीमहोदय व आमदारांसोबत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. अखेर यशस्वी तोडगा निघत नसल्याने 12 जानेवारी 2019 ला खंडाळा ते मंत्रालय (मुंबई) या मार्गावर शेतकरी बचाव कृती समितीने पायी अर्ध नग्न आंदोलन केले.

हा मोर्चा 22 जानेवारी 2019 रोजी मंत्रालयावर धडकला. त्या वेळी तालुक्‍यातील केसुर्डी, खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, मोर्वे, भादे व शिवाजीनगर या गावातील सुमारे 150 शेतकरी सहभागी झाले. या वेळी तत्काळ बैठक लावून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मोर्चाच्या मागण्या मान्य करून त्यावर कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यातूनच पुढे टप्पा क्रमांक तीन रद्द करण्याची प्रमुख मागणी मान्य झाली; परंतु शिवाजीनगर येथील संपूर्ण क्षेत्र आणि भादे गावातील काही शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात आली नाही, तसेच टप्पा क्रमांक एक व दोनमधील केसुर्डी गावातील सर्व मागण्या प्रलंबित आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आंदोलन करूनही काहीशी नाराजीची किनार निर्माण झाली. 

टप्पा तीनमधून सहा गावांतून वगळलेले क्षेत्र 
1) अहिरे - 242.7 हेक्‍टर 
2) बावडा - 62.7 हेक्‍टर 
3) खंडाळा - 16.99 हेक्‍टर 
4) मोर्वे - 388.62 हेक्‍टर 
5) भादे - 108.40 हेक्‍टर 
6) म्हावशी - 143.64 हेक्‍टर 
एकूण गट - 787 व क्षेत्र 961.795 हेक्‍टर 
 

""औद्योगिक टप्पा क्रमांक एक व दोनमध्ये येणाऱ्या केसुर्डी गावातील सर्व मागण्या प्रलंबित आहेत. शिवाजीनगर आणि भादे गावांतील काही शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात आली नाही. 15 टक्‍के जमीन परतावा, पर्यायी रस्ते, भूमिपुत्रांना रोजगार, फसवणुकीवर फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अडचण दूर होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे.'' 
- तालुका शेतकरी बचाव कृती समिती - खंडाळा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com