
'शिवभोजन' सर्वसामान्यांचा आधार; लाखाे नागरिक घेताहेत आस्वाद
सातारा : कोरोनाच्या काळात कष्टकरी, मजूर व गरजू लोकांना राज्य सरकारची शिवभोजन थाळी आधार ठरत आहे. या शिवभोजन थाळीसाठी जिल्ह्यात 30 सेंटरच्या माध्यमातून दररोज तीन हजार दोनशेहून अधिक थाळ्यांचे वाटप केले जात आहे. कोरोनाच्या काळात या थाळींच्या संख्येत दीडपट वाढ केल्याने जिल्ह्यात महिनाभरात एक लाखाहून अधिक थाळ्यांचे वाटप होणार आहे. शिवभोजन थाळी ही सुविधा मोफत सुरू असल्याने योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांची भूक भागत आहे.
राज्यभरात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात कष्टकरी, मजूर, बेघर गरीब असणाऱ्या अनेकांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. राज्यात ही योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला दहा रुपयांत शिवभोजन थाळी दिली जात होती. त्यानंतर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाच रुपयाला जेवण देण्यास सुरुवात केली. मात्र, सद्य:स्थितीत राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती उद्भवल्याने गरजू नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात बचत गट, हॉटेल, खानावळ, सरकारी कार्यालयातील कॅन्टीन आदी ठिकाणी ही केंद्रे चालविण्यास दिली आहेत.
रेशन व्यवस्थाही कोलमडली; सरकारच्या चर्चेनंतर फेडरेशनची भुमिका ठरणार महत्वाची
जिल्ह्यात एकूण 30 ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. त्यामध्ये बहुतांश केंद्रांवर दिवसाला शंभरहून अधिक शिवभोजन थाळींचा लाभ घेतला जात आहे. जिल्ह्यात दिवसभरात सुमारे तीन हजार दोनशेहून अधिक जणांना थाळीचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये दोन पोळ्या, भात, वरण, एक भाजी अशा प्रकारचे जेवण शिवभोजन केंद्रावर दिले जात आहे. कोरोनामुळे सध्या प्रत्येक केंद्रावर पार्सलची व्यवस्था करण्यात आली असून, सकाळी सात ते 11 या वेळेत जेवण दिले जात आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, मजुरांना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येत आहे.
आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच
कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक 12 केंद्रे
शिवभोजन थाळी मोफत असल्याने गरजू लोकांना आधार वाटत आहे. जिल्ह्यातील शिवभोजन थाळीची सर्वांत जास्त केंद्रे कऱ्हाड तालुक्यात असून, सातारा शहरात चार ठिकाणी आहेत.
शिवभोजन थाळींच्या संख्येत दीडपट वाढ करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील केंद्रावर नागरिकांना चांगल्या प्रतीचे जेवण दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी, मजूर व गरजू लोकांना या योजनेचा फायदा होत आहे. कोरोना काळात शिवभोजन केंद्रांवर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली.
अजित पवारांच्या निर्णयाची अंमलबजावणी हाेईना : डाॅ. भारत पाटणकर
Web Title: Satara Marathi News Shivbhojan Thali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..