
सातारा : "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत राहणारी लालपरी तब्बल अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा पोचणार आहे. तालुक्यांच्या ठिकाणांवरून महत्त्वाच्या गावांमध्ये ही मुख्य ग्रामीण वाहिनी सुरू करण्याबाबत परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या वतीने नियोजन सुरू आहे. सोमवारपासून (ता. १५) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवाही बंद झाली होती. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन लालपरीची चाके रस्त्यांवर अहोरात्र फिरत होती. कधीही एवढ्या दीर्घकाळ एसटीची चाके थांबली नव्हती. एसटी बंद असली की सर्वत्र अस्वस्था पसरायची. परंतु, कोरोना संसर्गाच्या काळात सर्व सूत्र बदलून गेली. तसेच एसटीचेही झाले आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एसटीला जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे जिल्ह्यात एसटी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांची जिल्ह्यामध्ये 22 मे पासून अंमलबजावणी सुरू झाली. सुरवातीच्या टप्प्यात प्रतिसाद पाहण्यासाठी तालुका ते तालुका ठिकाणांपर्यंत जाणाऱ्या 31 बसगाड्यांच्या 101 फेऱ्यांचे नियोजन विभागीय कार्यालयामार्फत करण्यात आले होते.
प्रत्येक बसमधून 20 प्रवासी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, ग्रामीण भागातून नागरिकांना येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे 22 मे पासून तसा मोठा प्रतिसाद एसटी वाहतुकीला मिळाला नाही. सरासरी 15 ते 16 प्रवासी घेऊनच एसटीला धावावे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातील महत्त्वाच्या भागांना तालुक्याशी जोडणारी एसटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय विभागीय कार्यालयामार्फत घेण्यात आला आहे.
त्यामध्ये फलटण - लोणंद, लोणंद - वाई, कऱ्हाड - ढेबेवाडी, कऱ्हाड - मसुर अशा स्वरूपाच्या गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर असलेल्या आगारांना त्यांच्या नफ्यामध्ये असणाऱ्या मार्गांची माहिती मागविण्यात आली आहे. सोमवारपर्यंत विभागीय कार्यालयातून गाड्यांच्या मार्गाचे नियोजन केले जाणार आहे. सध्या 30 गाड्यांवरून पहिल्या टप्प्यात 50 गाड्यांपर्यंत संख्या नेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून येणारा प्रतिसाद पाहून 15 दिवसांमध्ये ही संख्या 100 गाड्यांपर्यंत नेण्याचा विचार महामंडळाकडून सुरू असल्याची माहिती एसटी महामंडाळाकडून देण्यात आली.
36 कोटी 58 लाख रुपयांचा फटका
लॉकडाउन घोषीत झाल्यापासून एसटीची पर जिल्ह्यात तसेच आंतरजिल्हा वाहतूक पूर्णतः बंद आहे. त्यामळे सुमारे एक कोटी 31 लाख दहा हजार 70 किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे एसटीचे 36 कोटी 58 लाख आठ हजार रुपयांचा महसूल बुडाला आहे. त्याचा फटका महामंडळाला बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.