वाई : तालुक्यातील २७ गावांमधील चार हजार ७८० हेक्टर क्षेत्रास सिंचन लाभ देणाऱ्या कवठे-केंजळ उपसा सिंचन योजनेचे काम ८५ टक्के पूर्ण झाले; परंतु उर्वरित काम न्यायप्रविष्ट बाबीमुळे रखडल्याने मागील तीन- चार वर्षांपासून ही योजना पूर्णपणे बंद आहे. योजनेची संपूर्ण यंत्रणा धूळखात पडल्याने त्याला गंज चढू लागला असून, पंपगृह कबुतरखाना बनले आहे. आगामी काळातील पाणी टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग काढून योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
योजना वंचित भागासाठी..
या योजनेंतर्गत मौजे शेंदूरजणे (ता. वाई) येथील धोम डावा कालवा किमी क्र.१४ येथे पंपगृह उभारून दोन टप्प्यामध्ये मिळून १०१ मीटर उंचीपर्यंत उपसा करून तेथून बंद पाइपद्वारे गुरुत्व पद्धतीने उत्तर-पूर्व भागातील पाण्यापासून वंचित क्षेत्रास सिंचन लाभ देण्याचे नियोजन आहे. माजी मंत्री (कै.) मदनराव पिसाळ यांच्या कार्यकाळात योजनेस कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने २००१-२००२ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. त्यावेळी योजनेची मूळ किंमत ४१ कोटी ६६ लाख रुपये इतकी होती.
खर्च वाढला तिपटीने...
कार्यादेश १२ डिसेंबर २००१ रोजी निघाला. दोन-तीन वेळा भूमिपूजन झाले; परंतु निधीअभावी काम सुरू झाले नाही. २००१ ते २००५ पर्यंत योजनेस निधी उपलब्ध झाला नाही. विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून योजनेच्या द्वितीय सुधारित खर्चास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्याची किंमत १२८ कोटी ९८ लाख रुपये आहे. त्यापैकी काही निधीही उपलब्ध झाला.
दोन वर्षेच पहिला टप्पा सुरू...
त्यानंतर २०१५-१६ मध्ये ठेकेदाराकडून योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित करून गुरुत्वीय नलिकाद्वारे योजनेत समाविष्ट असलेल्या १४ गावांना खरीप व रब्बी हंगामात पाणी सोडण्यात आले, तसेच शेंदूरजणे तलाव, केंजळ गावाजवळील आवळी व बेघर वस्तीचा तलाव, लोहारे गावाचा तलाव येथे पाणी सोडून पिण्यासाठी व गुरे ढोरे यांच्या पिण्यासाठी व चारा पिकासाठी पाणी देण्यात आले. या काळात १७५० हेक्टर क्षेत्रास लाभ झाला.
धोम व बलकवडीसारखी धरणे उशाला असूनही तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. कवठे- केंजळ योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, सदर योजना खर्चिक आहे. आज पाण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात संघर्ष चालू आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित लढा दिला पाहिजे. विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांच्या वेदनेची दखल घ्यावी आणि ही योजना रद्द करून मुख्यमंत्र्यांकडून नव्याने योजना मंजूर करून घ्यावी.
-ॲड. नीलेश डेरे, समन्वयक, तालुका पाणी संघर्ष समिती, वाई.
लाभ क्षेत्रातील गावे
शेंदूरजणे, परखंदी, लोहारे, बोपर्डी, सुलतानपूर, केंजळ, खानापूर, पांडे, बोपेगाव, ओझर्डे, कवठे, सुरूर, मोहोडेकरवाडी, वहागाव, देगाव, अनवडी, शिरगाव, गुळुंब, चांदक, किकली, काळंगवाडी, बेलमाची, भुईंज, वेळे, मोडेकरवाडी लगडवाडी, कोचळेवाडी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.