सातारा : सातारा जिल्हा हा स्वच्छता विषयामध्ये देशात कायम अग्रेसर राहिलेला आहे. स्वच्छता ही मानवी जीवनाची सवय व्हावी, तसेच लोकसहभागातून कुटुंब व गाव स्तरावर घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन व प्लॅस्टिक निर्मूलन यासारखे उपक्रम राबवून गावे स्वच्छ व सुंदर करावीत. गावांमध्ये पर्यावरण समृद्धी गाव सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
पालखी सोहळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत स्वच्छता दिंडी कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वच्छता दिंडी उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, किरण सायमोते, खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील व खंडाळा पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौडा म्हणाले, ‘‘यंदा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षामार्फत वारकऱ्यांमध्ये पाणी व स्वच्छता प्लॅस्टिक बंदी याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छता दिंडी कलापथक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पालखी विसाव्याच्या गावामध्ये दुर्गंधी व स्वच्छता होऊ नये, यासाठी औषध फवारणी व मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.