

Future of Millions of Students Threatened
esakal
लेखक - सुदर्शन कुडचे
भारतामध्ये स्पर्धा परीक्षा या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट जोडलेल्या आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय नोकरी आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निर्णायक भूमिका बजावतात. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर मेहनत, आर्थिक त्याग आणि मानसिक ताण सहन करून या परीक्षांची तयारी करतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभर मोठी चर्चा निर्माण झाली. लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादामुळे परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेच्या मर्यादा समोर आल्या.
२०२४ आणि २०२६ मधील वैद्यकीय प्रवेश परीक्षेभोवती निर्माण झालेला वाद हा भारतातील परीक्षा व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. देशभरातील सुमारे चोवीस लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर अनियमितता, गुणांमधील विसंगती आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला. तपास यंत्रणांनी पुढे उघड केले की काही ठिकाणी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर पोहोचली होती. काही आरोपी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका परीक्षा आदल्या रात्री मिळाल्याची कबुली दिली होती. तपासामध्ये काही शाळांमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला. प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षित साठवणुकीच्या ठिकाणी अनधिकृत प्रवेश मिळवून प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचे तपासात समोर आले.