Budget 2021 : देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हातात सोपवण्याचा कट; राहुल गांधींची टीका

rahul gandho over budget.
rahul gandho over budget.

Union Budget 2021 : लेदर ब्रिफकेसला रामराम ठोकत मोदी सरकारने 'वहिखात्या'तून बजेट आणण्याचा प्रघात सुरु केला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पेपरलेस बजेट सादर करण्यात आले आहे. कोरोनाच्या आधीच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. या कंबरडं मोडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. 'आत्मनिर्भर भारतासाठी बजेट' असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले हे तिसरे बजेट आहे. 

या बजेटवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटलंय की, सामान्य लोकांच्या हातात पैसे आणण्याऐवजी मोदी सरकारने देशाची मालमत्ता त्यांच्या उन्मत्त भांडवलदार मित्रांच्या हातात सोपवण्याचा कट आखला आहे. 

आज सकाळीच राहुल गांधी यांनी ट्विटरवर या बजेटकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांनी ट्विटरवर तीन मुद्दे टाकले होते. MSME ला पाठिंबा, शेतकरी आणि कामगारांसाठी रोजगार हवा. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य क्षेत्रावर अधिक तरतूद व्हायला हवी. सीमेच्या सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रावरील खर्चामध्ये वाढ करण्यात यायला हवी. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी देखील या बजेटवर  खोचक अशी टीका केली आहे. त्यांनी एका उदाहरणाद्वारे हे बजेट पोकळ असल्याचं दाखवून दिलंय. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजप सरकारने मला एका गॅरेज मेकॅनिकची आठवण करुन दिली आहे. जो गॅरेज मेकॅनिक आपल्या ग्राहकांना  म्हणतो की, मी तुमच्या गाडीचे बिघडलेले ब्रेक्स दुरुस्त करु शकत नाही, म्हणून मी तुमच्या गाडीचा हॉर्न अधिक मोठा आवाज करेल अशापद्धतीने दुरुस्त करतो. 

मात्र, नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांनी या बजेटचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, हे सुपर्ब बजेट आहे. या बजेटद्वारे फक्त कोरोनापूर्व काळातील परिस्थितीला चालना मिळत नाहीये तर येत्या 3-4 वर्षांसाठी सुद्धा हे दिशादर्शक आहे. हे एक व्यवहार्य, विवेकी आणि पुढे नेणारं बजेट आहे. महत्त्वाचं म्हणजे करात कोणतीही छेडछाड केली गेली नाहीये आणि नवीन उपकरही लावण्यात आले नाहीत. अस मत अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com