नाशिक/पंचवटी : अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्राचीन परंपरा आहे. कालौघात वाणाच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल झाला असला तरी अद्यापही ही परंपरा टिकून असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या सगळ्यात नाशिकची पारंपरिक ओळख असलेल्या तांबे-पितळीच्या भांड्यांना अधिकमासात महत्त्व आले आहे. तयार खाद्यपदार्थांचा व्यवसाय फुलत आहे.
शुक्रवार (ता. १८) पासून अधिकमासाला सुरवात झाली.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात जावयांना सुग्रास भोजनासह कपडे, तांब्याची भांडी, अनारसे, बत्तासे असे सछिद्र असलेले पदार्थ देण्याची पद्धत आहे. या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ किंवा ग्रामीण भागात ‘धोंड्याचा महिना’ असेही संबोधले जाते. यात जावईबापूंना घरी बोलावून गोडधोड जेवणासह शर्ट-पॅन्टपीस, साड्यांना प्राधान्य देतात. याशिवाय तांब्याची भांडी, निरंजन, तांब्याचे घंगाळे, कळशी, तबक, गडवे देण्याची पद्धत आहे. अधिकामासाच्या या प्रथेमुळे सध्या कोरोनामुळे मरगळ आलेल्या बाजारात तांब्याची भांडी घेण्यासाठी चैतन्य आले आहे.
तेहेतीसच पदार्थ का?
अधिकमासात जावयाला तांब्याच्या भांड्यांसह अनारसे, बत्तासे देतात. इंग्रजी वर्षात ३६५ दिवस असले, तरी मराठी वर्ष ३५६ दिवसांचे असते. या हिशेबाने प्रत्येक महिन्यातील ११ दिवसांचा फरक गृहित धरून तीन महिन्यांचे ३३ दिवस होतात. त्यामुळे ३३ अनारसे, बत्तासे दानाची प्रथा आहे. त्यासाठी बाजारात १३० ते १५० रुपयांपर्यंत अनारसे उपलब्ध आहे.
बदलत्या काळात वाण देण्याची परंपरा टिकून आहे. यंदा वाणासाठी आकर्षक आकारातील ग्लासासह तांब्याचे आकर्षक जग विक्रीसाठी आले असून, त्याला मोठी मागणी आहे.
- राजेश आंबेकर, विक्रेते
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.