ट्रॉफी, सन्मानचिन्ह बनविण्याच्या व्यवसायाची भरारी; अनलॉकनंतर मागणीत वाढ
नाशिक : देशासह राज्यात मार्चपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश जारी करण्यात आले होते. तेव्हापासून सगळे व्यवसाय बंदच होते. राज्यात अनलॉक झाल्यानंतर सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत. ट्रॉफीसह सन्मानचिन्ह बनविण्याचा व्यवसायही १५ टक्क्यांनी सुरू झाला असून, पुन्हा एकदा भरारी घेण्यास सज्ज झाला आहे.
ट्रॉफी, सन्मानचिन्हची मागणी वाढली
कोरोनाकाळात सर्वच व्यवसायांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत बरीच शिथिलता मिळाली असून, ट्रॉफीसह सन्मानचिन्ह बनविण्याचा व्यवसाय शैक्षणिक, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समांरभ आदी क्षेत्रावर अवलंबून आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्र सुरू झाले आहे. क्रीडा स्पर्धा काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत. या क्षेत्रातूनही मागणी वाढली आहे. ट्रॉफीसह सन्मानचिन्ह बनविणाऱ्या व्यावसायिकांनी लॉकडाउनमध्ये दुसरा व्यवसाय सुरू करून व्यवसायातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ दिलेले नाही. दिवाळीपर्यंत हा व्यवसाय लॉकडाउनच होता; मात्र दिवाळीनंतर या व्यवसायाने उभारी घेतली असून, या व्यवसायाला १५ टक्क्यांवरून शंभर टक्के प्रतिसाद मिळण्यासाठी कोरोना लसीची वाट पाहावी लागेल असेच चित्र आहे. विविध क्षेत्रांत कोरोनायोद्ध्यांचा सत्कार होत असल्याने कोरोनायोद्धा असलेली ट्रॉफी, सन्मानचिन्हची मागणी वाढली आहे, तसेच कोरोनाकाळात बंद झालेल्या या व्यवसायाला अन्य क्षेत्रही खुले झाल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
अनलॉकनंतर परिस्थितीत सुधारणा
मार्चमध्ये लॉकडाउननंतर नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजकांना स्थगित करावे लागले. मात्र, अनलॉकनंतर परिस्थितीत सुधारणा होत असून, येत्या तीन महिन्यांत परिस्थिती सामान्य होईल, तसेच कार्यक्रम शंभर टक्क्यांवर सुरू होतील, असे इमेज ट्रॉफीचे संचालक समीर मांजेरकर यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.