
गेल्या वर्षी २८ मार्चला जिल्ह्यात कोरोनोचा पहिला रुग्ण आढळला होता आणि त्या वेळी संपूर्ण लॉकडाउन होते. पण आज पंधराशे रुग्ण आहेत. कोरोनारुग्णांची वाढ अशीच होत राहिली, तर गेल्या वर्षाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.
नाशिक : गेल्या वर्षी २८ मार्चला जिल्ह्यात कोरोनोचा पहिला रुग्ण आढळला होता आणि त्या वेळी संपूर्ण लॉकडाउन होते. पण आज पंधराशे रुग्ण आहेत. कोरोनारुग्णांची वाढ अशीच होत राहिली, तर गेल्या वर्षाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लॉकडाउन टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काळजी घ्यावी, असे आवाहान जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
मांढरे म्हणाले, की जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा सप्टेंबरमध्ये ११ हजारांवर होता. तो आता एक हजारापर्यंत घटला आहे. पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा त्यात दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा एक हजार ५४४ वर पोचला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वर्षभरापासून कोरोनाशी लढा देताना दोन- तीन महिन्यांत थोडी आशा निर्माण झाली होती. मात्र, निष्काळजीमुळे दोन-तीन दिवसांत संसर्गात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे लॉकडाउनसारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर सुरक्षाकवच म्हणून केला पाहिजे.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
थेट सहभाग टाळा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक कार्यक्रमात थेट सहभागी होण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे कार्यक्रमांचा आनंद घेतल्यास कोरोनाचा संसर्ग तर रोखता येईलच तसेच सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतो. उपस्थिती अनिवार्य असेलच अशा ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन मांढरे यांनी केले.
कोरोनाबाधित
नाशिक शहर ९०९
मालेगाव शहर १८४
नाशिक ३७
चांदवड १३
सिन्नर ५१
दिंडोरी ३४
निफाड ८३
देवळा १७
नांदगाव ४९
येवला २५
त्र्यंबकेश्वर ३६
कळवण १२
सुरगाणा ०६
पेठ ०२
एकूण १५४४
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय