नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. १) सकाळी सहापासून गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी दोन हजार ४०० दशलक्ष घनफूट आवर्तन सुटले. नव्या वर्षातील हे पहिलेच आवर्तन असून, तब्बल महिनाभर चालणार आहे.
९९० दक्षलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी
जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरी गाठली आहे. धरणे काठोकाठ भरली असून, गावोगावी तलाव, विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे पाटबंधारे
विभागाने यंदा गंगापूर, दारणा व मुकणेतून पिण्याचे पाणी, सिंचनासाठीचे आवर्तन काहीसे उशिराने सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०२१च्या पहिल्या दिवशी गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून एकत्रितरीत्या दोन हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. सिंचनासाठी दीड हजार, तर उर्वरित ९९० दक्षलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी, तसेच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी असणार आहे. गंगापूर धरणातून सिंचन व पिण्याचे पाणी कालव्यांद्वारे व एकलहरेसाठी नदीपात्रातून सोडले. त्यामुळे कालव्याच्या मार्गावरील गाव पाणीवापर संस्थांना आवर्तनाचा फायदा होईल.
दरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्याचा वेग ८०० ते हजार क्यूसेक आहे. त्यामुळे नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये. तसेच पात्रालगत कुठली वाहने, साहित्य किंवा वस्तू ठेवू नयेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
यंदा मुबलक पाणी
जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये आजमितीस ५६ हजार ९२४ दक्षलक्ष घनफूट (८७ टक्के) साठा आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यात प्रमाणापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी पाणी देण्याची गरज भासणार नाही. पाण्याची उपलब्धता बघता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाणीवापर संस्था, नळपाणी पुरवठा योजना व सिंचनासाठी मागणीनुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना यंदा मुबलक पाणी मिळेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.