चांदोरी (जि. नाशिक) : सायखेडा (ता. निफाड) येथील गोदावरी नदीपात्रात तेलकट, काळा रंगमिश्रित पाणी आणि पानवेली वाहून आल्यामुळे अनेक मासे रात्रीपासून तडफडत आहेत. त्यात अनेक मासे मृत असण्याची शक्यता आहे.
अनेक माशांचा तडफडून मृत्यू
गोदावरी नदी ज्या परिसरातून वाहते त्या परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. अनेक ठिकाणी केमिकल कंपन्या असल्यामुळे काही कंपन्या दूषित पाणी गोदावरी नदी पात्रात सोडतात. त्यामुळे पाणी खराब होऊन जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका पोहचतो. त्याशिवाय नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाहत येऊन सायखेडा येथील पुलाला अडकतात. अनेक दिवस पानवेली एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे सडल्यामुळे त्याचा परिणाम मत्स्य प्राण्यांवर होतो. मंगळवारी (ता.५) सायंकाळी मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला आणि त्यासोबत पानवेली वाहून आल्या . शिवाय केमिकलमुळे पाणी दूषित झाल्यामुळे त्याचा परिणाम जलचर प्राण्यांच्या आरोग्यावर होऊन अनेक माशांचा तडफडून मृत्यू झाला.
कठोर कारवाईची मागणी
बुधवारी (ता.६) सकाळी नागरीकांना पाण्यावर मृत मासे तरंगताना आढळली. औदयोगिक विकास होत असतांना जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात येत असून, प्रशासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. नदीपात्रातील पानवेल काढण्यात प्रशासन हतबल झाले आहे. केमिकल पाण्यात सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी वाहून आल्यामुळे पाणी काळसर आणि तेलकट दिसत आहे. अनेक वर्ष एकाच ठिकाणी पानवेली अडकून राहिल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. आजमितीस हजारो मासे पाण्यावर तडफडताना दिसत असून, अनेकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो .
- किरण गडाख, ग्रामस्थ, चांदोरी .
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.