नाशिक : बोर्डाच्या भाषा विषयाच्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत 20, 11 असे गुण, तर 20 गुणांच्या तोंडी परीक्षेत 17, 18 असे गुणदान पाहून आश्चर्य वाटते. विज्ञानच्या प्रात्यक्षिकांचेही असेच, लेखी परीक्षेत 70 पैकी 18, तर कुणाला 20 गुण अन् प्रात्यक्षिकाला 30 पैकी 25, 27 गुण. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अशा गुणांवर विश्वास बसत नाही; पण महाविद्यालयांच्या हातात असलेल्या गुणदानामुळे विद्यार्थ्यांना पास होणे मात्र सोपे झाले आहे.
मागील वर्षी दहावीच्या भाषा विषयांच्या तोंडी परीक्षेच्या 20 गुणांना ब्रेक लावल्यानंतर बारावीला हा नियम लावला जाणार होता. मात्र निकालात कमालीची घट झाल्याने एका वर्षांतच हा नियम गुंडाळला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आदी विज्ञानाच्या विषयांना शंभरापैकी 30 गुण प्रात्यक्षिकांना आहेत.
दहावी-बारावीला प्रात्यक्षिक अन् तोंडी परीक्षेने पास होणे सोपे
इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, ऊर्दू आदी सर्व भाषांसाठी 20 गुण तोंडी परीक्षेला आहे. लेखी पेपर न होता केवळ प्रात्यक्षिक कार्यावर दिले जाणारे पर्यावरण विषयाचे तब्बल 50 गुण कनिष्ठ महाविद्यालयांच्या हातात आहेत. याशिवाय अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आदी विषयांचे प्रोजेक्ट व तोंडी परीक्षेला 20 गुणही महाविद्यालयस्तरावर दिले जातात. याचमुळे प्रात्यक्षिकला 30 पैकी 25 गुण आणि लेखी परीक्षेला 80 पैकी 15-20 गुण, असे चित्र 20 ते 40 टक्के विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसून येते. हे गुणदान म्हणजे "आंधळं दळत..' असा प्रकार म्हणावा लागेल.
साटेलोटे होऊन तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गुण द्या, आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देतो
इंग्रजीसारख्या विषयालाही शिक्षक 15 ते 19 गुणांच्या दरम्यान गुणदान करतात. परिणामी, उरलेले पंधरा ते वीस गुण लेखी परीक्षेतून मिळविणे सोपे होत असल्याचेही विद्यार्थी बोलून दाखवत आहे. तोंडी परीक्षेचे गुणदान विषय शिक्षकच करतात. मात्र प्रात्यक्षिक परीक्षांना बाह्य पर्यवेक्षक असतो. पण मंडळांकडून ही नेमणूक करताना दोन महाविद्यालयांमधील शिक्षकांमध्येच आदान-प्रदान केले जाते. परिणामी, साटेलोटे होऊन तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गुण द्या, आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देतो, असा तह ठरविला जातो. मंडळाकडून अडचण होऊ नये म्हणून भाषा वगळता इतर सर्व विषयांचे जर्नल व प्रोजेक्ट लिखाणकाम मात्र शिक्षक अगदी काळजीपूर्वक करून घेतात. पण याचाही अभ्यास केल्यास नैसिर्गिक गुणवत असलेले विद्यार्थी सोडले तर बाकी अनेकजणांनी एकमेकांचाच उतारा केलेला असतो.
आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा, शाळेचे कौतुक व्हावे, समाजात प्रतिमा उचावी, संस्थाचालकांनी कौतुक करावे, अशा कारणांनी सगळा खटाटोप होतो. मात्र, या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापनाचे तीन तेरा वाजले आहेत. गुण शाळांच्या हाती असल्याने आकडे फुगत असले तरी वास्तवता तपासणारी कोणतीही यंत्रणा विभागीय मंडळाकडे नसल्याचे वास्तव आहे.
हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.