निम्मा जिल्हा रोगप्रतिकारशक्ती तयार होण्याच्या वाटेवर! रुग्णसंख्या नोव्हेंबरअखेर कमी होण्याचा अंदाज 

corona commodities.jpg
corona commodities.jpg

नाशिक : आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांशी झालेल्या संवादातून निम्मा जिल्हा रोगप्रतिकाशक्ती तयार होण्याच्या वाटेवर पोचल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले, की नोव्हेंबरच्या अखेरनंतर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज आहे. 
 

कोरोनाविरुद्ध नाशिककरांची लढाई : रुग्णसंख्या नोव्हेंबरअखेर कमी होण्याचा अंदाज 

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरात कोरोना विषाणू संसर्गाने पाय पसरले असताना ग्रामीण भागातही त्याचा फैलाव वाढला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील एक हजार ९१७ गावांपैकी ९७४ गावांत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसेच दोन दिवसांत घरोघरचे सर्वेक्षण पूर्ण होत असताना रुग्ण शोधले जाणार आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागात गुरुवारअखेर २३ हजार १२२ जण ‘पॉझिटिव्ह' आढळले. पण त्याचवेळी ३७ हजार ४३१ जण ‘निगेटिव्ह' असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रमाण एकूण जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या १.४ टक्के इतके आहे. लागण झालेल्यांचे प्रमाण अर्धा टक्का राहिले. आजअखेर १८ हजार ४०० जण कोरोनामुक्त झाले. पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. जिल्हा परिषदेने ॲन्टिजेन टेस्टचे प्रमाण वाढवले आहे. दिवसाला सर्वसाधारणपणे चारशे ते साडेचारशे नवे रुग्ण निष्पन्न होताहेत. ४९९ जणांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण २.१५ टक्के आहे. सद्यःस्थितीत चार हजार २२३ रुग्ण उपचार घेताहेत. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी' अभियानांतर्गत सर्वेक्षणाचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, दोन हजारांपर्यंत नवीन रुग्ण आढळले आहेत. मुळातच ६० टक्के लोकसंख्येला लागण झाल्यावर ‘हर्ड इम्युनिटी डेव्हलप' होते. याशिवाय ६० टक्के रुग्ण लक्षणेविरहित असल्याचे आरोग्य विभागाला आढळले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘हर्ड इम्युनिटी' तयार झाली नाही, हे निष्पन्न करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतर्फे ‘अँटीबॉडीज' तपासणे आवश्‍यक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 


ग्रामीणमध्ये मास्क न वापरण्याची समस्या 
ग्रामीण भागामध्ये मास्क न वापरण्याची समस्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आढळून येत आहे. त्यामागचे नेमके कारण यंत्रणेने शोधण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षणविरहित रुग्ण घरी बरे होत असल्याने मास्क वापरण्याची काळजी घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे. देवळा तालुक्यात रुग्णांची संख्या वाढून आता कमी होऊ लागली आहे. चांदवड आणि दिंडोरी तालुक्यांत रुग्णांची संख्या कमी झालेले प्रमाण स्थिरावले आहे. नांदगाव तालुक्यात औरंगाबादकडील भागात आणि मनमाड रेल्वे जंक्शनच्या स्थलांतरणामुळे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. येवला तालुक्यातील दुसरा टप्पा स्थिरावत चालला आहे. पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांत शहरांशी निगडित व्यवसाय-व्यापाराच्या निमित्ताने फिरतीवर असलेल्यांच्या माध्यमातून लागण होत असल्याचे आढळले आहे. कळवण तालुक्यात मात्र आता रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होऊन हीच स्थिती स्थिरावण्याच्या टप्प्यावर आहे. नाशिक तालुक्यात गिरणारे आणि जातेगाव भागातील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मालेगाव तालुक्यात दाभाडी पट्ट्यात रुग्ण वाढले होते आणि आता सौंदाणे-कळवडी भागात रुग्ण वाढले. बागलाण तालुक्यात यापूर्वी रुग्ण न आढळलेल्या गावांमध्ये साथ पसरत आहे. निफाड तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होण्याच्या दिशेने निघाली आहे. निफाडसारखी स्थिती सिन्नर तालुक्यातील आहे. 


कोरोनाची लागण झालेली गावे 
तालुक्याचे नाव गावांची संख्या कोरोनाची लागण झालेली गावे कोरोना न पोचलेली गावे 
बागलाण १७० ६७ १०३ 
चांदवड १११ ८० ३१ 
देवळा ५० ३६ १४ 
दिंडोरी १५५ ८२ ७३ 
इगतपुरी ११८ ८८ ३० 
कळवण १५१ २७ १२४ 
मालेगाव १४१ ९५ ४६ 
नांदगाव ९९ ७१ २८ 
नाशिक ७६ ६३ १३ 
निफाड १३६ ११९ १७ 
पेठ १४४ १३ १३१ 
सिन्नर १२८ १०९ १९ 
सुरगाणा १९० २२ १६८ 
त्र्यंबकेश्‍वर १२४ ३४ ९० 
येवला १२४ ६८ ५६  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com