onion.jpg
onion.jpg

कांद्याची शंभरी, बटाटा पन्नाशीत! सामान्यांच्या डोळ्यातून पाणी 

नाशिक / पंचवटी : बटाट्याने पन्नाशी, तर कांद्याने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी घरगुती जेवणातून कांदा गायब झाला आहे. हॉटेलमधील मिसळ, भेळ आदींमधूनही कांदा गायब झाला आहे. काही व्यावसायिकांनी कांद्याला पर्याय म्हणून चक्क कोबीचा वापर सुरू केला आहे. 

कांद्याला पर्याय म्हणून चक्क कोबीचा वापर
ज्यात जेवणात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय हॉटेल, घरगुती खाणावळीतही कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. परतीच्या पावसाने कांद्यासह सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्यातच अनेक ठिकाणी चाळीतला कांदाही सडून गेल्याने कांद्याचा दर सर्वसामान्य ग्राहकांच्या कक्षेबाहेर गेल्याने अनेक महिलांनी घरगुती जेवणातून कांदा हद्दपार केला आहे. काहींनी त्याचा वापर निम्म्यावर आणला आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या एक किलो कांद्यासाठी चक्क ९० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. 
नाशिक शहर अन् झणझणीत मिसळ, भेळभत्ता हे जुने समीकरण. कांद्याच्या वाढत्या दरामुळे अनेक भेळभत्ता विक्रेत्यांनी आता कांद्याऐवजी चक्क कोबीचा वापर सुरू केला आहे. भेळभत्ता पार्सल घेतले, तरी त्यासोबत कांदा दिला जात असे. आता मात्र उच्चांकी दरामुळे कांदा मिळणार नाही, असा फलकच काहींनी लावला आहे. 

ग्राहक तुटायला नको म्हणून... 
कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी नाश्ता व जेवणातून कांदा गायब झाला आहे. या परिस्थितीतही हॉटेलचे नाव टिकवून ठेवण्याच्या धडपडीत अनेक व्यावसायिक ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी मागेल तेवढा कांदा देतात. शहरातील मिसळ खवय्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही दिवसांपासून शहराच्या परिसरात मिसळ खाण्याची ठिकाणे नव्याने सुरू झाली आहेत. अशा ठिकाणी सकाळपासून उशिरापर्यंत मिसळ उपलब्ध असते. ग्राहकांची नाराजी नको म्हणून बहुसंख्य विक्रेते ग्राहक मागतील तेवढा कांदा देतात. यासाठी नफ्यात घट झाली तरी चालेल; पण ग्राहक तुटायला नको, अशी भूमिका मखमलाबाद परिससरातील एका प्रसिद्ध मिसळ व्यावसायिकाने घेतली आहे. 

दर वाढल्याने सामान्यांच्या डोळ्यातून पाणी 

कांद्याचा भाव वाढला तरी ग्राहकांना कांदा द्यावाच लागतो. व्यवसायात टिकून राहण्यासाठी हॉटेलमधील पदार्थांच्या दरातही वाढ केलेली नाही. - रमेश निकम, संचालक हॉटेल राजहंस, भांडी बाजार 

कांदा-बटाटे गृहिणींच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे कितीही भाववाढ झाली तरी कांदे खरेदी करावेच लागतात, हे वास्तव आहे. मात्र गरजेपुरताच कांदा वापरते. - ताराबाई माळेकर, गृहिणी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com