Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा येथील उदय नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी प्रत्यक्षात आज पूर्ण झाली. पावसाळा सुरू झाला की ओरपा येथील नागरिकांमध्ये पुलाअभावी पुराचीच अधिक भीती निर्माण होते.
पूल नसल्यानेच आतापर्यंत पुराने पाच जणांचा बळी घेतला तर वर्षानुवर्षे येथील प्रत्येक नागरिक पुराचा धोका पत्करत होते; परंतु तेथे पूल मंजूर झाला असून, त्याचे प्रत्यक्ष भूमिपूजनही करण्यात आले. त्यामुळे ओरपावासी धोक्यापासून सुटकेचा निःश्वास घेत आहे. (Bridge over Uday River at Orpa finally approved Bhumi Pujan by Dr gavit nandurbar news)
सातपुड्यातील सर्वांत मोठी असलेली उदय ही नदी ओरपा गावातून जाते. या ठिकाणी असलेल्या पायवाटेवरून ओरपा गावासह उमरागव्हाण, नेंदवण, खुर्चीमाळ, पाटबारा जमाना व अन्य गावांतील हजारो आदिवासी बांधव मार्गस्थ होतात.
पर्यायी वाट नसल्याने प्रत्येकाला येथून जावेच लागते. पूल नसला व नदीला पाणी-पुराचा प्रवाह अधिक असला तरी पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. पाण्याचा प्रवाह अधिक असताना नदी ओलांडताना अनेकांना प्राणास मुकावे लागले. यावर मात करण्यासाठी येथे पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केला.
त्यानुसार मंजूर झालेल्या पुलाचे भूमिपूजन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भाजपा अक्कलकुवा तालुकाध्यक्ष नीतेश वळवी, उमराव्हाणचे सरपंच अविनाश वसावे, उपसरपंच नर्मदाबाई वसावे, माजी पोलिसपाटील बुलाखी वसावे, सामाजिक कार्यकर्ते राया वसावे.
जमानाचे सरपंच वीरसिंग वळवी, उपसरपंच हिराबाई वसावे, जेहमाबाई दिलीप वसावे, ॲड. महेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते अनिल वसावे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम वसावे, आपसिंग वसावे, धर्मा वसावे, संतोष वसावे, रवींद्र वसावे, महेंद्र वसावे, किरण पाडवी, लोकेश पाडवी, जयसिंग वळवी, सुरूपसिंग वसावे आदी उपस्थित होते.
जमाना व ओरपा येथे भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये दोन संरक्षण भिंती, काँक्रिटीकरण रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय व अन्य कामांचा समावेश आहे.
पुरामुळे अन्यत्र अंत्यविधी
नदीला प्रवाह अधिक असल्याने अनेक दिवंगत बांधवांना स्मशानभूमीपर्यंत नेता आले नाही. परिणामी त्यांच्यावर अन्यत्र अंत्यविधी करावी लागला. त्यात इंद्रसिंग भामटा वसावे यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे. या पुलामुळे अशी परिस्थिती येणार नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दोन पिता, दोन पुत्रांचा बळी
अनेक गावांमधून वाहणाऱ्या उदय नदीच्या दोन्ही बाजूने शेतजमिनी आहेत. शेती कामानिमित्त शेतकऱ्यांनाही नदी ओलांडून जावेच लागते. ओरपाच्या सरपंच पाड्यातील रहिवासी कर्मा मंजा वसावे यांचा काही वर्षांपूर्वी उदय नदीच्या पुरानेच बळी घेतला. त्यांचा मृतदेह नातेवाइकांना हाती लागलाच नाही. शेवटी मृतदेहाविना अंत्यविधी करावा लागला.
या घटनेला काही वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर मागील वर्षी पुन्हा त्यांचा मुलगा सुनपसिंग कर्मा वसावे हेदेखील शेती कामानिमित्तच या नदीतून जाताना पुरात वाहून गेले, त्यात त्यांचाही मृत्यू झाला. याशिवाय भामटा नरसी वसावे हे पुरात वाहून न गेले, त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर त्यांचा मुलगा इंद्रसिंग भामटा वसावे यांचाही पुरातच मृत्यू झाला. शिवाय मंदा वसावे या तरुणीनेही मृत्यूस कवटाळले. या परिस्थितीतून ओरपावासीयांची सुटका होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.