Nandurbar News : सातपुडा पर्वतरांगेत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने पर्यावरण संतुलन बिघडले, त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात कमी झाले. (Creation of 20 water bodies in Ranipur forest area nandurbar news)
परिणामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागते. काही वेळा ते मानवी वस्तीत शिरतात. मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष परिसराला नवा नाही. वन्यप्राण्यांना वनहद्दीतच पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राणीपूर वनक्षेत्रात २० पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती राणीपूर रेंजचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांनी दिली.
वाढत्या उन्हामुळे जंगल क्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले असून, तहानेने व्याकूळ झालेले वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत घुसत आहेत. त्यातून वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष निर्माण होत असतो. हा संघर्ष टाळण्यासाठी शहादा वन विभागाने विविध वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राखीव, संरक्षित आणि पूर्वापार जतन केलेले वनक्षेत्र आहे. त्यांपैकी उनपदेव, तोरणमाळ, धडगाव, नवापूर, मोलगीसह तालुक्यात वनाच्छादित क्षेत्र सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात बिबट्या, अस्वल, रानगवे, मोर, रानडुकरे, साळिंदर, घोरपड आदी वन्यप्राण्यांचा अधिवास आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
उन्हाळा सुरू झाल्यानंतर वनक्षेत्रातील सर्वच जातकुळीतील वन्यप्राण्यांचे खाद्य, पाण्याच्या शोधार्थ स्थलांतर सुरू होते. या स्थलांतरातून वन्यप्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होतो. हे टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वन विभागाने उन्हाळ्याच्या काळात वन क्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्यावर भर दिला आहे.
वीस पाणवठे तयार
वनक्षेत्रात २० पाणवठे तयार केले आहेत. कालापाणी, लेघापाणी, खडकी, तोरणमाळ, सावऱ्यादिगर या ठिकाणी तर काही पाणवठे नैसर्गिक असून, त्या ठिकाणचे झरे जिवंत, वाहते राहण्यासाठीच्या विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
वनक्षेत्रातील पाणवठ्याची पाणीपातळी तपासण्याची जबाबदारी वन कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गाडी रस्ता आहे तेथे टँकरच्या मदतीने, तर दुर्गम भागात दुचाकीवरून ३० लिटर क्षमतेचे पाण्याचे कॅन नेत पाणवठ्याची पाणीपातळी वनरक्षक राखत आहेत.
पाणवठे दत्तक घेण्याची अपेक्षा
तोरणमाळ खोऱ्यात वन्यप्राण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात असून, या ठिकाणी वन विभागाने पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमधील पाणीपातळी राखण्याचे काम वनरक्षक करत असून, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत आहे. या परिसरातील पाणवठ्यांची देखभाल, पाणीपातळी कायम राखण्यासाठी त्या परिसरातील ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिकांनी पाणवठे दत्तक घ्यावेत, अशी अपेक्षा वन विभागाने व्यक्त केली आहे.
"राणीपूर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांची संख्या जास्त असल्याने वाढत्या उन्हामुळे जंगलात पाणवठे भरण्यात येत आहेत. या पाणवठ्यांमध्ये हॅडपंपच्या सहाय्याने पाणी भरले जात आहे. काही ठिकाणी छोटे-मोठे झरे वाहत असल्याने त्यातून वन्यप्राणी आपली तहान भागवतात." -महेश चव्हाण, वनक्षेत्रपाल, राणीपूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.