
Dhule Unseasonal Rain : गेल्या दोन दिवसांपासूनच्या अवकाळी पावसामुळे सोळागाव काटवन परिसरात शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असून, शेवाग, कांदा, कांदा रोपे व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दुष्काळी परिस्थितीत ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीप्रमाणे बळीराजा संकटात सापडला आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे भयावह चित्र असताना अवकाळीमुळे अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.(Due to unseasonal rain farmers have suffered in Solagaon dhule news )
यंदा अल्प पावसामुळे साक्री तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. जेमतेम खरीप हाती आला असताना रब्बीची पेरणीही नगण्य झाली आहे.
सोळागाव काटवन परिसरातील म्हसदीसह धमनार, ककाणी, राजबाई शेवाळी, भडगाव (मा.), काळगाव, बेहेड, दारखेल, नाडसे, विटाई, निळगव्हाण, छाईल, प्रतापपूर आदी भागात विहिरी उपशावर आल्या असून, काही ठिकाणी कोरड्याठाक पडत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
शेवगा, कांदा अन् कांद्याच्या रोपांची धूळधाण
कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे बहुतेक शेतकऱ्यांनी शेवगा लागवड केली आहे. तथापि, दरही बऱ्यापैकी मिळत असल्याने शेवगा पीक परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अवकाळी पाऊस, वादळ आणि प्रचंड गारठ्यामुळे शेवग्याची फुले गळून पडली आहेत.
दुसरीकडे काढलेल्या कांद्याची अवस्था अधिक अवघड आहे. काढणीवर व काढलेला कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय कांदारोपेही पाण्यात सापडली असून, गारपीट, प्रचंड गारठ्यामुळे सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धुक्यामुळे फळपिकांनाही फटका
अवकाळी पावसामुळे प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून धुके निर्माण होऊन ढगाळ वातावरणामुळे फळपिकांनाही फटका बसणार आहे. यंदा ककाणी, काळगाव, दारखेल भागात शेतकऱ्यांनी डाळिंबासह सीताफळ पिके घेतली आहेत. बहुतांश ठिकाणी डाळिंब, सीताफळे काढली जात आहेत.
वातावरण बदलाचा परिणाम फळपिकांनाही बसणार आहे. कृषी आणि महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे
नेमेचि येतो पावसाळा याप्रमाणे दर वर्षी नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेलेच आहे. दुष्काळाने भरडलेला शेतकरी अवकाळीच्या दुहेरी संकटात सापडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, खासदार डॉ. हीना गावित यांनी शासनदरबारी नुकसानीचा पाठपुरावा करत नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नियमित पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. दुष्काळाची झळ पोचलेल्या शेतकऱ्यांना अजून कोणतीच मदत मिळाली नसताना निसर्गाने अवकाळीचा दणका माथी मारला आहे.
''अवकाळी पावसात सोळागाव काटवन परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळात अवकाळीने हातातोंडाशी आलेली घास हिरावला आहे. शासन यंत्रणेने नुकसानग्रस्त भागाचा तत्काळ पंचनामा करून भरपाई मिळवून द्यावी.''-कुणाल शिवाजीराव भदाणे, संयोजक, सोशल मीडिया आयटीसेल, भाजप, धुळे ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.