इगतपुरी (जि. नाशिक) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी कलचाचणी यंदापासून नियमित विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना (17 नंबर फॉर्म) देता येणार आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षी 15 लाख विद्यार्थ्यांची ही चाचणी घेण्यात आली होती. गेल्या वर्षी पहिलेच वर्ष असल्याने ही चाचणी अनिवार्य नव्हती; मात्र यंदापासून ती नियमित विद्यार्थ्यांना अनिवार्य केली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी बहि:स्थ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही चाचणी देता येत नव्हती; मात्र यंदा बहि:स्थ विद्यार्थ्यांना चाचणी देता येणार आहे.
म्हमाणे म्हणाले, की बहिःस्थ विद्यार्थ्यांची संख्या लाखोंत होती. गेल्या वर्षी पहिलेच वर्ष होते; त्यामुळे नियोजन करणे शक्य नव्हते; मात्र यंदा आम्ही विद्यार्थ्यांना चाचणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही परीक्षा घेण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली, ती यंदा घेणार नाही; मात्र यंदा कलचाचणीचा पेपर श्यामची आई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनेच काढला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांकडून तो प्रमाणित करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
|