धिंडरा खाईल्या नी..मतदान करी या !

धिंडरा खाईल्या नी..मतदान करी या !

कापडणे : धुळे जिल्ह्यात आज (ता.15) शुक्रवारी 183 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अधिक संख्येने मतदान व्हावे. यासाठी उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे. मकर संक्रांती नंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. 'कर' या दिवशी खानदेशात सामीष भोजनाची प्रथा आहे. त्या अगोदर धिंडरे केले जातात. अन चेष्टेने धिंडरा खाईल्या नी गधडा व्हायी या, असे सांगितले जाते. मात्र आज धिंडरा खाईल्या नी गधडा वायी या असे म्हणण्याऐवजी 'धिंडरा खाईल्या नी मतदान करी या' असे सांगितले जात आहे.

धुळे जिल्ह्यात 218 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. यापैकी पस्तीस ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आज 183 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून प्रचारात मोठी चुरस निर्माण झाली होती. आता मतदान काढून अधिक मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चुरस वाढली आहे. 

कापडणे, सोनगीरमध्ये अधिक चुरस
कापडणे व सोनगीर या मोठ्या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात या दोन्ही गावांना मोठे महत्त्व आहे. या गावात ज्या पक्षाची सत्ता त्या उमेदवाराला विधानसभेसाठी बळ मिळत असते. म्हणून आमदार कुणाल पाटील, भाजपाचे जिल्हा परीषद सदस्य राम भदाणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी व राष्र्टवादीचे माजी कृृषी सभापती किरण पाटील या गावांकडे लक्ष ठेवून आहेत.

खलाणे-पाटील पडद्या आडच ?
भाजपा कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे कापडणे गटातील सदस्य आहेत. तर धुळे जिल्हा धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील येथील आहेत. या दोन्हींच्या समर्थकांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. मात्र दोन्ही लोकप्रतिनिधी निवडणूकीसाठी गावाकडे फिरकलेले नाहीत. किंबहुना उमेदवारही दिलेले नाही गाव आमचे आहे. सर्वच उमेदवार आमचे आहेत. त्यांच्यात राजकारण नको. एकाला मदत अन दुसऱ्याला झाली नाही, असे आरोपही व्हायला नकोत. म्हणून त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे चर्चिले जात आहे.

कर ना दिन मतदान नी सामीष भोजनाकडे दुर्लक्ष
खानदेशात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी खानदेशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. पूर्वजांना नैवेद्य तथा आगारी अर्पण केली जाते. या दिवशी सर्वच एकत्रित येत भोजनाचा आस्वाद घेतात. मतदानाची धामधूम असतानाही कार्यकर्त्यांनाही घरीच जेवण करावे लागले. संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी कर मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. या दिवशी सामिष भोजनाची प्रथा टिकून आहे. त्या अगोदर धिंडरे अर्थात थिरडेचा अल्पोहार केला जातो. ते खाल्यानंतर चेष्टा मस्करीला प्रारंभ होत असतो. धिंडरा खाईल्या नी गधडा व्हायी या, अशी चेष्टा महिला पुरुष करीत असतात. पण आज धिंडरा खाईल्या नी मतदान करी या असे मोठ्या उत्साहाने म्हटले जात आहे.

मतदानाचा टक्का वाढेल..!
मकर संक्रांतीसाठी बरेचसे चाकरमनी गावाकडे आलेले आहेत. तर मतदानाचे निमित्त साधूनही येणार्‍यांची संख्या वाढली आहे. परीणामी मतदानाचा टक्का वाढणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी पंचावन्न ते साठ, जिल्हा परीषद व पंचायत समितीसाठी साठ ते पासष्ट टक्के मतदान होते. तर ग्रामपंचायत हा स्थानिक भाऊबंदकीचा प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. परीणामी सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com