दोंडाईचा : दुष्काळामुळे यंदा जलस्रोत आटले असून, शिंदखेडा मतदारसंघातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. (Jalgaon MLA Jaykumar Rawal demanded that immediate measures should be taken to solve problem of water scarcity in villages)
पत्राचा आशय असा ः जिल्ह्यातील शिंदखेडा हा कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुका आहे. यंदाही राज्यातील दुष्काळग्रस्त ४० तालुक्यांत शिंदखेडा तालुक्याचा समावेश झालेला होता. या वर्षी या तालुक्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे व तलावात जेमतेम पाणी होते.
आता तीव्र उन्हाळा सुरू झाला असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता जाणवत असल्याने भीषण टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या गावांना तत्काळ तात्पुरता पाणीपुरवठा कसा होईल याबाबत बैठक घेऊन त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. (latest marathi news)
त्यात तात्पुरता पाणीपुरवठा योजना, टॅंकर सुरू करणे, विहीर अधिग्रहण करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या आचारसंहिता आहे आणि प्रशासनावर ताण आहे; परंतु नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची पहिली प्राथमिकता असावी, अशी अपेक्षा आमदार रावल यांनी व्यक्त केली आहे.
वॉटरग्रिडच्या कामास गती यावी
शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त ८५ गावांना शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी तापी नदीतून ८५ गाव वॉटरग्रिड योजनेचे काम सुरू आहे. त्या कामाची सद्यःस्थिती व गती वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन त्या कामाचा आढावा घ्यावा. या कामाची गती वाढविण्याची सूचना यंत्रणेला द्यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.