
घोडे बाजार म्हटला म्हणजे आठवते सारंगखेडा यात्रोत्सव. अगदी देश- विदेशातून अश्व येतात आणि त्यांच्या टापांच्या आवाजाने सारे मैदान हलवून टाकतात. यंदा मात्र सारंगखेड्याचे हे घोडे मैदान सुनेसूनेच राहणार आहे.
सारंगखेडा (नंदुरबार) : चारशे वर्षांची परंपरा असलेला अश्व बाजार आणि पुरातन काळापासून सुरू असलेली येथील श्री एकमुखी दत्ताची यात्रा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. यामुळे यात्रा परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात अश्वांच्या टापांचे गुंजन, पाळणे, झुल्यांचा आवाज तसेच यात्रेनिमित्त होणारी गर्दी दिसणार नाही. यात्रोत्सव होणार नसल्याची वार्ता गावात पोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
नक्की वाचा- बालिकेचा बळी तरीही प्रशासन गंभीर नाही; ठेकेदाराची पाठराखण
पुरातन काळापासून सुरू असलेल्या येथील यात्रोत्सवाबाबत महिनाभरापासून विविध चर्चा सुरू होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेसंदर्भातील निर्णय जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित होता. मात्र, त्याला मुहूर्त सापडत नव्हता. याबाबत प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत फक्त मंदिर ट्रस्टींची बैठक झाली. मात्र, कोणताही निर्णय झाली नाही. यात्रा भरण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, तहसीलदार डॉ. मिलिंद कुळकर्णी, पोलिस निरीक्षक शिरसाठ, संजय चौधरी, एकमुखी श्रीदत्त मंदिर संस्थेचे अर्जुन पाटील, भिकन पाटील, अंबालाल पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत श्री. रावल यांनी एकमुखी दत्त यात्रा भरण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी यात्रोत्सवाला परवानगी नाकारली.
धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा
कोट्यावधीची उलाढाल
सारंगखेडा येथील यात्रोत्सव अर्थात अश्वबाजारातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असते. साधारण दहा- पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात मोठमोठे सेलिब्रेटींची देखील उपस्थिती लाभत असते. दरवर्षी दिसणाऱ्या या साऱ्या चित्राला यंदा नागरीक पारखे होणार आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे