धुळे : कोरोनामुळे धुळे- नंदुरबार (Dhule corona update) जिल्ह्यांतील तब्बल १३३ बालके अनाथ झाली आहेत. यात आई-वडील गमावलेल्या बालकांची संख्या ७१ आहे, तर एक पालक गमावलेली मुले ६२ आहेत. सर्वाधिक अनाथ झालेल्या बालकांची आकडेवारी नंदुरबार जिल्ह्यातील आहे. (Dhule-Nandurbar-district-133 children-father-mother-death-coronavirus)
नंदुरबारला ९३ मुले अनाथ झाली (Nandurbar corona update) आहेत. त्यातील ६६ मुलांनी आपले आई-वडील, तर २७ मुलांनी एक पालक गमावले आहेत. पालकत्व गमावलेल्या बालकांची ही आकडेवारी मंगळवार (ता. २५) पर्यंतची आहे. मात्र, हे आकडे आणखी वाढू शकतात. निराधार (Child Orphan) झालेल्या या बालकांची जबाबदारी महिला व बालविकास खाते (Women and Child Development Department) घेणार आहे. अनाथ बालकांची व्यवस्था शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहात होणार आहे.
पाच बालकांचे आई- वडीलच हिरावले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुळ्यातील ४० बालकांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावून नेले आहे. पाच बालकांच्या आई-वडील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. माता-पित्यांपैकी एक पालक गमावणाऱ्या जिल्ह्यातील बालकांची संख्या ३५ इतकी आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची शोधमोहीम सुरुरू आहे. त्यामुळे अशा बालकांच्या संख्येत अजून वाढ होऊ शकते. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन केले आहे.
टास्क फोर्स पाहणार जबाबदारी
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी, तसेच अनाथ बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्य सरकारने जबाबदारी घेतली आहे. कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न गंभीर झाल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे. हा टास्क फोर्स त्या-त्या जिल्ह्यातील मुलांची जबाबदारी पाहणार आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ चा फलक लावणे, कोरोना उपचारासाठी भरती होताना पालकांकडून आपल्या पाल्याचा ताबा कोणाकडे द्यावा, याची माहिती संबंधित पालक वा रुग्णाकडून भरून घेण्याच्या मार्गदर्शक सूचना महापालिकांना केल्या आहेत.
दरम्यान, निराधार झालेल्या बालकांना आर्थिक मदत करण्याबाबत शासनाचे निश्चित धोरण अद्याप ठरले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या त्या पाल्यांच्या गरजेनुसार आवश्यक मदत केली जाणार आहे. निवारा नसलेल्या बालकांना निवाऱ्याची सोय करणे, सपुपदेशन करणे व कायदेशीर हक्क मिळवून देणे आदी मदत केली जाणार आहे.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची जिल्ह्यात शोधमोहीम सुरू आहे. अशा बालकांची माहिती दररोज आयुक्त कार्यालयाकडे सादर केली जात आहे. कोरोनाकाळात मातृ-पितृछत्र हरपलेल्या बालकांसंबंधी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी महिला बालविकास विभागाशी संपर्क साधावा.
-हेमंत भदाणे, महिला बालविकास अधिकारी, धुळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.