‘अमरावती’च्या पाण्यामुळे बंधारे ओव्हर फ्लो 

‘अमरावती’च्या पाण्यामुळे बंधारे ओव्हर फ्लो 

दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्प यंदाही पूर्ण क्षमतेने भरला आहे. गेल्या आठवड्यात उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तलाव, नाल्यांवर बांधलेले सर्वच बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. शेतशिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगाम चांगलाच बहरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

यंदा परतीच्या पावसाने अमरावती धरण दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. खरीप हंगामाचे फारसे उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना नाही. रब्बी हंगाम फुलण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. अनेक वर्ष दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी आतातरी सुखावेल, अशी अपेक्षा आहे. रब्बीची सर्व मदार अमरावतीच्या पाण्यावर आहे. त्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सध्या खरीप हंगामाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. या भागात कापसाची मोठी लागवड झाली आहे. महागडी बी-बियाणे, रासायनिक खते, फवारणी करून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी भांडवल अडकविले आहे. कापसाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. किमान सहा ते सात हजार रुपये भाव कापसाला मिळाला पाहिजे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

दरम्यान, मजुरांचीही तीव्र टंचाई जाणवत आहे. वाढीव रोजंदारीने बाहेरगावाहून मजुरांना आणावे लागत आहे. वेळेवर वेचणी न झाल्यास कापसाचे वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे वाढीव रोजंदारीने मजूर उपलब्ध करून वेळेवर कापूस काढण्याची लगबग सुरू आहे. लवकरच कापसाचे पीक खाली करून उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अमरावती नदीवरील बंधारे सध्या ओवर फ्लो झाले आहेत. त्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com