तेराशे वर्षांपासूनच्या वंशावळीचे केले जातेय जतन; ताडपत्र, ताम्रपत्र, खलिता ते कागदापर्यंतचा रंजक प्रवास  

तेराशे वर्षांपासूनच्या वंशावळीचे केले जातेय जतन; ताडपत्र, ताम्रपत्र, खलिता ते कागदापर्यंतचा रंजक प्रवास  

जळगाव : भारतात प्रत्येक समाजात वंशावळी लिहिण्याची परंपरा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अखिल भारतीय अहीर सुवर्णकार समाजाचे कुलगुरू (भाट) रामदास ओंकार अहिरराव यांच्याकडे गेल्या 1300 वर्षांपूर्वीची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या कालखंडापासूनची वंशावळी त्यांनी आजही जपून ठेवलेली आहे. ताडपत्र, ताम्रपत्र, बांबूची लाटिव. खलिता ते कागदापर्यंतचा हा प्रवास रंजक आहे. 

महाभारत घडल्यानंतर महर्षी व्यासांपासून भारतीय वंशावळी लिहिण्याची परंपरा सुरू झाली. ही परंपरा आजतागायत कायम आहे. प्रत्येक समाजाची, घराण्याची, कुळाची वंशावळी त्या समाजातील कुलगुरूंकडून लिहिली जात असे. हे कुलगुरू प्रत्येक समाजातील नागरिकांकडे आमंत्रित केले जात असत. त्यांच्याकडे जाऊन ते वंशावळी लिहित असत. आज काही ठिकाणी ही परंपरा सुरू आहे. असेच जळगाव शहरातील अखिल भारतीय अहीर सुवर्णकार समाजाचे कुलगुरू रामदास अहिरराव यांच्याकडे सोनार समाजाची सुमारे 1300 वर्षांपासूनची वंशावळी आहे. ताडपत्रापासून ते आजपर्यंत कागदावर लिहिलेल्या वंशावळी त्यांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 72 लाख जणांचा माहिती त्यांनी एकत्रित केली आहे. 

तेरा पिढ्यांपासून परंपरा 
अहीर सुवर्णकार समाजाचे कुलगुरू रामदास अहिरराव यांच्या बारा पिढ्या वंशावळी लिहीत होत्या. आता ते स्वत: देखील कुलगुरू म्हणून सोनार समाजातील वंशावळी लिहीत आहेत. त्यांचा मुलगा देखील आता परंपरागत काम करीत असल्याने गेल्या 13 पिढ्यांपासून ते वंशावळी लिहून त्याची माहिती साठवून ठेवत आहे. 


ताडपत्रावर वंशावळीचे जतन 
गेल्या तेराशे वर्षांपूर्वी कागद नसल्याने त्यावेळी ताडपत्रावर वंशावळी लिहिली जात होती. त्यानंतर ताम्रपत्र, नंतर बांबूच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या "लाटीव'चा वापर केला. यानंतर खलिताचा वापर देखील वंशावळी लिहिण्यासाठी करीत होते. यानंतर आता कागदावर लिहिण्यास सुरवात केली आहे. रामदास अहिरराव यांच्याकडे गेली 1300 वर्षे जुनी ताडपत्रावर लिहिलेली वंशवाळी आजही त्यांनी जपून ठेवली आहे. या ताडपत्रावर पूर्वीच्या काळी एका पानावर चार पिढ्यांची वंशावळी शॉर्ट लिपिमध्ये लिहिली आहे. 

आजही देवनागरीचा वापर 
अहिरराव यांच्याकडे देशभरातील समाजबांधव आपली वंशावळी बघण्यासाठी येत असतात. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती देखील केली आहे. तसेच त्यांच्याकडे आतापर्यंत 72 हजार समाज बांधवांची वंशावळीमध्ये माहिती आहे. पूर्वी देवनागरी लिपीत लिहिलेली वंशावळी आता कागदावर उतरवीत असून, त्यामध्ये देखील देवनागरी व मराठीचा वापर केला जात असल्याची माहिती रामदास अहिरराव यांनी दिली. 

वंशावळीवर "लॉकडाउन'चा परिणाम नाही 
सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनच्या काळात देखील सुवर्णकार समाजाचे कुलगुरू रामदास अहिरराव हे बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे ते समाजबांधवांची माहिती दूरध्वनीवरून घेत वंशावळी लिहिण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे "लॉकडाउन'चा परिणाम त्यांच्या परंपरागत कार्यावर झालेला नाही. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com