चौपदरीकरणात काम कमी...तांत्रिक दोषच अधिक! 

higway imege
higway imege

जळगाव: महामार्गाचे चौपदरीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी ते तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असावे लागते. मात्र, जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात नसल्याचे समोर आले आहे. या कामासह दुभाजकाच्या कामातही तांत्रिक दोष राहत असल्याचे दिसत असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला त्याची देखभाल-दुरुस्ती करावी लागणार असल्याने मूळ कामच परिपूर्ण करण्याकडे महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे. 

महामार्गाच्या चौपदरीकरणासारख्या मोठ्या प्रकल्पावर काम करताना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होणे गरजेचे असते. एकदा काम सुरू होऊन ते पूर्ण झाल्यानंतर नव्याने त्या कामाची रचना उभारणे कठीण जाते. काम निकृष्ट दर्जाचे व तांत्रिक दोष असलेले झाल्यास त्याला कायमस्वरूपी दुरुस्तीचे ग्रहण लागते. अनेक ठिकाणच्या या अनुभवानंतरही जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीने त्यातून धडा घेतलेला नाही. 

सर्वेक्षणाविनाच काम 
चौपदरीकरणाचे काम करताना त्या भागाचे भौगोलिक सर्वेक्षण करणे गरजेचे असते. महामार्ग ज्या जमिनीवरून मार्गस्थ होतोय, ती जमीन मुरमाड आहे, काळ्या मातीची आहे की खडकाळ... अशा बाबी अभ्यासल्यानंतर त्यावर कोणत्या कामाचे किती थर असायला हवे हे ठरत असते. मात्र, शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम अशाप्रकारच्या कोणत्याही सर्वेक्षणाविनाच केले जात असल्याची बाब समोर आली आहे. अर्थात, या जागेवरून सध्या अस्तित्वात असलेला महामार्ग गेलेला असल्याने या सर्वेक्षणाची गरज नाही, असा दावा "न्हाई'तर्फे केला जात आहे. 

प्रकल्प व्यवस्थापनही नाही 
चौपदरीकरण अथवा पायाभूत सुविधांमधील अन्य स्वरूपाचा कोणताही मोठा प्रकल्प उभारायचा झाल्यास त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती (project management consultancy) नेमली जाते. ही समिती संपूर्ण कामावर लक्ष ठेवून असते. परंतु, शहरातील चौपदरीकरणाचे काम हे अशाप्रकारच्या समितीच्या देखरेखीखाली होत असल्याचे सध्यातरी दिसत नाही. 

दुभाजकाच्या कामाबाबत संभ्रम 
सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाची रुंदी 30 मीटर आहे. चौपदरीकरणासाठी किमान 60 मीटर रुंदी लागते. ती या महामार्गालगत उपलब्ध आहे. मात्र, तरीही पूर्ण 60 मीटर रुंदीची जागा या कामासाठी वापरली जात नाही. या चौपदरीकरणात मध्यभागी असलेले दुभाजकही तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहे की नाही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. कारण, सध्या सुरू असलेले दुभाजकाचे काम तसेच राहणार असेल तर या दुभाजकाचा काहीही उपयोग होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com