राज्यात सत्तेसाठी महाविकास जिल्हास्तरावर "समन्वय'भकास 

maha vikas aaghadi jalgaon
maha vikas aaghadi jalgaon

जळगाव : शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षाचे "महाविकास'आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. राज्यस्तरावर तीन पक्षात समन्वय झाला आहे. परंतु जिल्हास्तरावर मात्र सत्तेतील पक्षाचा समन्वयाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांना आपले परिसरातील प्रश्‍नाची आपल्याच सरकारमधील मंत्र्यांकडून सोडवणुकीसाठी अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. 

सरकार आपले पण सांगू कुणाला? 
शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह त्यांच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपले सरकार आले आहे. याचा अभिमान आहे. मात्र शिवसेनेचा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुचंबणा होत आहे. ते आपल्या परिसरातील नागरिकांचा प्रश्‍न घेऊन येतात मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांशी ओळख नसल्यामुळे प्रश्‍न कुणाकडे मांडावा हा प्रश्‍न त्यांना पडलेला असतो. तर हीच परिस्थिती पक्षीय आमदार असलेल्या तालुक्‍यातही आहे. त्यामुळे कार्यकर्ते म्हणताहेत सरकार आपले आहे, पण माझे प्रश्‍न सांगू कुणाला अशी समस्या आहे. 

समन्वय समिती कुठाय? 
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकर्त्यात समन्वयासाठी तीन पक्षासह घटक पक्षातील सदस्यांची जिल्हास्तरीय समिती निश्‍चित करण्याचे ठरले होते. मात्र त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे आता कार्यकर्तेच या समन्वय समितीचा शोध घेत आहेत. 

आघाडी सरकार काळात समन्वय 
राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार असताना त्यांच्या काळात कार्यकर्त्यांचा समन्वय ठेवण्यात आला होता. त्यासाठी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पालकमंत्री होते त्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचा संपर्कमंत्री होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या परिसरातील समस्या जनतेपर्यंत पोहोचविता येत होत्या. मात्र सद्यःस्थितीत असे कोणतेही नियोजन नसल्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे. सरकार नवीन असल्यामुळे कार्यकर्ते शांत आहेत मात्र ती नाराजी वाढत गेल्यास तीनही पक्षांना ते अडचणीचे ठरणार आहे. हे मात्र निश्‍चित. 

मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झालेली आहे, लवकरच तीनही पक्षाच्या जिल्हास्तरावर पदाधिकाऱ्याची समन्वय समिती करण्याची शक्‍यता आहे. 
-संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी याच विषयावर तीनही जिल्हाध्यक्षांची तसेच आमदारांची चर्चा झाली होती. मात्र नंतर आमदार मुंबईला गेले होते. आता लवकरच बैठक घेऊन समन्वय समिती स्थापन करून कार्यकर्त्याच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यात येईल. 
-गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख, शिवसेना 

समन्वय समितीबाबत तीनही पक्षाची चर्चा करण्यात आली आहे. पालकमंत्री उद्या (ता. 17)जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येईल, लवकरच समिती स्थापन करण्यात येईल. 
-ऍड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com