पाडळसरेवर सात उपसा सिंचन योजना करण्यावरही भर : आमदार अनिल पाटील  

anil patilanil patil
anil patilanil patil


जळगाव : या पाच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासोबतच त्यावर 7 उपसा सिंचन योजना करून प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोचविण्यावर आपला भर राहील. तालुका व परिसरातील शेती समृद्ध झाली तर उद्योग व त्यातून रोजगार निर्मितीही होईल, अशी माहिती अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. 

प्रश्‍न : आपल्या अजेंड्यावरील प्राधान्याची कामे कोणती? 
अनिल पाटील : पाडळसरे प्रकल्प हा प्रमुख अजेंडा आहे. गेल्या वीस वर्षांत या प्रकल्पावर केवळ 500 कोटी खर्च झाले असून आणखी 2300 कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी कर्जरोखे, वित्तीय संस्थांकडून 1500 ते 1800 कोटी व राज्य शासनाने उर्वरित रकमेची तरतूद करण्यासंबंधी आपली मागणी आहे. त्यासाठी या प्रकल्पाविषयी आढावा बैठक घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील, अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली असून त्यासंबंधी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला संकल्प आहे. 

प्रश्‍न : पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल का? 
अनिल पाटील : होय, तसा निर्धारच मी केला आहे. या पाच वर्षांत प्रकल्पात पाणी अडेल, एवढे काम पूर्ण करू. नंतरच्या टप्प्यात त्यावर सात उपसा सिंचन योजना करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीपर्यंत पोचल्यास ते अधिक समाधानकारक असेल. शिवाय, प्रकल्पांतर्गत संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला, गावांचे पुनर्वसन या बाबीही अजेंड्यावर आहेत. 

प्रश्‍न : अन्य कोणती कामे विचाराधीन आहेत? 
अनिल पाटील : मतदारसंघात मुख्य रस्ते तर आहेत. मात्र, शेतमाल बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी चांगले शेतरस्ते नाहीत. त्यामुळे या कार्यकाळात शेतरस्ते तयार करण्याकडेही लक्ष असेल. बोरी, पांझरा, माळण नदीवर गेल्याकाळात पूल तर बांधले गेले. मात्र, ते "पूल कम बंधारे' केले असते तर त्याचा लाभ झाला असता. आता कोणत्याही नदीवरील पुलाचे काम प्रस्तावित असेल तर तो बंधारा म्हणून करता येईल का, याचाही अभ्यास करून शक्‍य असेल तिथे "पूल कम बंधारे' उभे करू. 

प्रश्‍न : जिल्ह्यातही महाविकास आघाडी राहणार काय? 
अनिल पाटील : होय, यापुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था अथवा अन्य कोणत्याही संस्थांच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सोबत लढणार आहोत. त्याबाबत प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिले आहेत. नुकतीच झालेली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. हे सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल, असा मला ठाम विश्‍वास आहे. 

प्रश्‍न : भविष्यात मंत्रिपदाची अपेक्षा आहे काय? 
अनिल पाटील : कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. मात्र, प्रादेशिक व पक्षीय समतोल राखण्यासाठी यावेळी खानदेशातून पक्षाचा एकमेव आमदार म्हणून माझ्या नावाचा विचार पक्षातून झाला असेल. तीन पक्षांचे सरकार असल्याने कदाचित ते शक्‍य झाले नसेल. आगामी काळात पक्षाने जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी म्हणून मोठी जबाबदारी द्यायचे ठरविले तर ती आपण स्वीकारू व तसे काम करू. 

"भूमिपुत्र' हा शब्द जनतेने दिला 
गत निवडणुकीत अमळनेर मतदारसंघात भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा चर्चेत राहिला, याबद्दल विचारले असता अनिल पाटील म्हणाले, मी या तालुक्‍याचा कार्यकर्ता आहे. जनतेला ते माहीत असून मावळत्या आमदारांबद्दलही माहिती होती. त्यामुळे मी प्रचाराला जायचो तेव्हा लोकांमधूनच "भुमिपूत्रालाच निवडून आणू' असा निर्धार व्यक्त व्हायचा. त्यामुळे हा शब्द आम्ही वापरण्यापेक्षा जनतेचेच तो दिला आणि त्यांनीच यावेळी मला विजयी करण्याचेही ठरविले होते, तसे त्यांनी करून दाखविले, असा दावा आमदार पाटील यांनी केला. 

भाजपत निष्ठावंतांवर अन्याय 
भाजपत मी 25 वर्षे होतो. या पक्षात निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्तेच नाही, म्हणून अन्य पक्षांमधून त्यांनी लोक आयात केले आहेत. त्यामुळे पक्षात निष्ठावंतांवर अन्याय होत आहे. आजच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत याच मुद्यावरुन हाणामारी झाली. या पक्षाकडे सत्ता होती म्हणून काहींनी स्वार्थासाठी पक्षात उड्या घेतल्या आणि हा पक्ष गुंडांचा पक्ष झाला. त्यातूनच हे प्रकार घडताहेत, अशी टीकाही अनिल पाटील यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com