"डायलिसिस'च्या रुग्णांमध्ये सर्वाधिक तरुण 

"डायलिसिस'च्या रुग्णांमध्ये सर्वाधिक तरुण 

जळगाव : दैनंदिन जीवनातील बदलाचा परिणाम हा माणसाच्या शरीरावर होत असतो. यामुळे अनेकांची किडनी देखील निकामी होत असते. किडनी निकामी झालेल्या रुग्णाला आठवड्यातून दोन वेळा "डायलिसिस'द्वारे रक्तपुरवठा केला जात असतो. दिवसाला हजारो रुग्ण "डायलिसिस'साठी शहरात येत असून, यामध्ये सर्वाधिक प्रमाण 15 ते 30 वयोगटातील तरुणांचे असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 


मधुमेह, उच्चरक्तदाब यासह माणसाच्या दैनंदिन आहारातील बदलाचा परिणाम हा थेट त्याचा शरीरावर होत असून, त्यामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षात किडनीचे विकार होणाऱ्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्या रुग्णांची किडनी निकामी झाली आहे. त्या रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावी लागते. शहरातील खासगी रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात डायलिसिस सेंटर आहे. गेल्या वर्षभरात डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, त्यातील अनेक रुग्ण हे तरुण वयोगटातील असल्याने ही चिंतेची बाब असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

"सिव्हिल'मध्ये अद्ययावत सुविधा 
जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागातील मशिनरी खराब झाल्यामुळे या ठिकाणावरील डायलिसिस विभाग बंद होता. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाला डायलिसिसपासून वंचित राहावे लागत होते. परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील डायलिसिस विभागात अद्ययावत सहा मशिनरी बसविण्यात आल्या आहे. 
 
"डायलिसिस'साठी अत्यल्प शुल्क 
किडनी निकामी झाल्यानंतर रुग्णाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते. वॉटर आणि रक्त हे दोन डायलिसिसचे प्रकार असून, खासगी रुग्णालयात डायलिसिससाठी 1 हजार 400 रुपये घेतले जातात. परंतु जिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी अत्यंत कमी शुल्क तर छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मानव कल्याण केंद्र यांच्यामार्फत 600 रुपयांमध्ये डायलिसिसची सुविधा मिळत आहे. 

स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित 
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत डायलिसिससाठी सुमारे 32 रुग्ण येत असतात. तर छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सुमारे 50 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात सहा जणांची वैद्यकीय यंत्रणा सज्ज असून, एका रुग्णास सुमारे चार ते पाच तास डायलिसिससाठी लागत असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

...अशी घ्यावी काळजी 
मधुमेह, अतिउच्च रक्तदाब यासह रोगप्रतिकार औषधींच्या सेवनामुळे किडनीचे विकार होऊन त्यावर उपचार घेण्यासाठी डायलिसिसची प्रक्रिया करावी लागते. यासाठी प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घेताना पुरेशी झोप घेणे आवश्‍यक आहे. फास्ट फूड खाणे टाळावे, तसेच दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, दिवसातून सुमारे तासभर व्यायाम करणे आवश्‍यक असून, औषध घेणे टाळावे. जेणेकरून त्याचा परिणाम किडनीवर होण्यापासून टाळेल. 

डायलिसिसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुण वयोगटातील रुग्णांचे आहे. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात स्वत:ची काळजी घेणे आवश्‍यक आहे. आहारातून फास्टफूडचा वापर टाळावा. 
- डॉ. विजय प्रजापत, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, 

दिवसातून चार ते पाच रुग्णांवर डायलिसिस करावे लागते. जिल्हा रुग्णालयात अद्ययावत मशिनरी असून, डायलिसिससाठी येणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. तसेच डायलिसिससाठी स्वतंत्र अशी वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 
- डॉ. भाऊराव नाखले, 
प्राध्यापक, औषध शास्त्र विभागप्रमुख, जिल्हा रुग्णालय, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com