वडाळी : एकीकडे उन्हाळा अधिक तीव्र होत असतानाच घशाला कोरड पडत आहे, तर दुसरीकडे तापमानाचा पारा उंचावल्यामुळे पाणी बॉटल तसेच शीतपेयांना मागणी वाढली आहे. शहादा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून आरओ प्लांट बसविले आहेत. वडाळी (ता. शहादा) येथील आरओ प्लांट ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची तहान नाममात्र दरात भागवत आहे. (Nandurbar Gram panchayats in Shahada taluka have installed RO plants to provide clean and cold water to villagers)
याउलट शहादा तालुक्यातील बहुतांश आरओ प्लांट देखभालीअभावी बंद अवस्थेत असून, धूळखात पडले आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. सद्यःस्थितीत ‘हीट’चा तडाखा चांगलाच बसत आहे. जिवाला गारवा मिळेल, असे थंड अन् शुद्ध पाणी शहादा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील नादुरुस्त असलेल्या आरओ प्लांटमुळे (ॲक्वा) तेथील ग्रामस्थांना मिळणे अवघड होताना दिसत आहे.
एकीकडे शासनाने ग्रामपातळीवर शहादा तालुक्यात लाखो, कोट्यवधी रुपये निधी खर्च करून आरओ प्लांट देऊ केले आहेत. आज जवळपास जलजीवन मिशनअंतर्गत शासनाने राहिलेल्या ठिकाणी आरओ प्लांटसह पाणीपुरवठा योजना देऊ केल्या आहेत; परंतु याची ठोस अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
शहादा तालुक्यात बहुतेक ठिकाणी हे प्लांट तर आहेत परंतु कुठे सुरू, कुठे बंद तर कुठे सुरू होण्यापूर्वीच नादुरुस्त तर काही ठिकाणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेल्या आरओ प्लांटचे व्यावसायिकीकरण होताना दिसून येत आहे. त्यातच वडाळी ग्रामपंचायत आपले वेगळेपण जपून शुद्ध पाणीपुरवठा ग्रामस्थांना करत आहे. (latest marathi news)
अधिकारी लक्ष देतील काय?
पंचायत समितींतर्गत शहादा तालुक्यात ज्या ठिकाणी आरओ प्लांट दिले आहेत, त्या ठिकाणी गटविकास अधिकारी यंत्रणेची काय परिस्थिती आहे याचा पाठपुरावा करतील काय? शासनाने ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.
दिवसाला ४०० ते ५०० जार
वडाळी ग्रामपंचायतीच्या आरओ प्लांटवर परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने शुद्ध पाणी घेण्यासाठी येतात, यात दिवसाला ४०० ते ५०० जार शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. आता उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता मागणी अधिक वाढली आहे. हिवाळा व पावसाळ्यात थोड्याफार प्रमाणात कमी होते. गावात एखाद्या घरात दुःखद प्रसंग असल्यास त्या ठिकाणी मोफत शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाते. लग्नसराईत खासगी आरओपेक्षा माफक दरात शुद्ध पाणी दिले जाते.
"ग्रामपंचायतीमार्फत आरओ प्लांट गेल्या सात ते आठ वर्षांपासून ग्रामस्थांच्या सुविधेसाठी नाममात्र दरात थंड व शुद्ध पाणी ना नफा ना तोटा तत्त्वावर देत आहे. ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कायम सेवेसाठी तत्पर आहे. देखभाल व दुरुस्तीचा खर्च जाता प्लांट सुरळीत सुरू राहतो, शुद्ध व थंड पाण्याचा तुटवडा भासणार नाही याची नेहमी काळजी घेतली जाते." -अभयगीर गोसावी, उपसरपंच, ग्रामपंचायत, वडाळी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.