नाशिक : कोरोना संकटाच्या काळात कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांना राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार ठरत आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले. पहिल्याच दिवशी ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले, तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती पहावी..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागाने गुरुवारी (ता. १५) मोफत शिवभोजन थाळी वितरणाचे आदेश दिले. त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत. तसेच योजनेवर टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती पहावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्याकाळात भुजबळ यांनी गेल्यावर्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. यंदा पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, की संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे. अशा गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.