
मालेगाव (जि. नाशिक) : जनसामान्यांसह प्रत्येकालाच हे आपलं सरकार आहे असे वाटू लागल आहे. जनहिताचे व सोयीचे निर्णय घेऊन हे विकासाभिमुख शासन आहे हे दर्शविण्यासाठीच आपण मुख्यमंत्री आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे.
जिल्हानिर्मितीने जनतेची सोय होणार आहे. ही अतिशय जुनी मागणी आहे. त्यामुळे मुंबई येथे मंत्रालयात संबंधितांची बैठक घेऊन जिल्ह्याचा निर्णय लवकरच घेवू. पश्चिम वाहिनी नद्या पुर्व वाहिनी करण्याचे व सिंचन क्षेत्र वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे.
त्याबाबत आपण सकारात्मक आहोत. मालेगावच्या पाणीपुरवठा टप्पा क्रमांक-२ व मलनिस्सारण टप्पा क्रमांक-२ ला मंजुरी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी (ता.३०) येथे केली. (CM Eknath Shinde statment about Decision of Malegaon district maharashtra political Latest marathi news)
येथील दौऱ्यात मसगा महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानावर झालेल्या जाहीर सभा व नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. श्री. शिंदे म्हणाले, की सभेला उपस्थित विराट जनसमुदाय आमच्यावरील प्रेमाची साक्ष देतो.
तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाढविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी काम केले. त्यांच्या समवेत मी व भुसे यांनी काम केले आहे. मला १५ लाख वारकऱ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही स्विकारणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती. तीच आम्ही घेतली. शिवसेना आम्ही वाचवली. राष्ट्रवादी काँग्रेसने पराभूतांना निधी दिला. शिवसेना आमदारांच्या अस्तीत्वाचा प्रश्न निर्माण झाला.
सत्तेतून पायउतार होऊन सत्ता सोडून आम्ही पुढे गेलो. पळवून नेले, गेलेले आमच्या संपर्कात आहेत. डुक्कर, कुत्रा, पानवाला अशी टिका झाली. त्यांच्याजवळ कोणीही गेले नाही. उलट आमचा एक जण वाढला. भाजपशी युती असतांना तुम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. सत्तेसाठी युती तुम्ही केली. मी शांत आहे.
त्याचा गैरअर्थ काढू नका. मी वेळ आल्यावर नक्की बोलेल. असंघटित कामगार, रिक्षाचालक, रिक्षावाले यांच्यासाठीही महामंडळ करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे. राज्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे बळ मागीतले आहे. त्यांच्या पाठबळाने पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करणार. यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले आहे.
सरकार लोकांसाठी आहे. मी माझ्यातला कार्यकर्ता मरू देणार नाही. तुम्ही सर्व आमदार मुख्यमंत्री आहात. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी जागा, मनपा पाणीपुरवठा टप्पा-२, मलनिस्सारण योजना टप्पा-२ ला मान्यता देतो. नियमीत कर्जफेड करणाऱ्या बचत गटांना व्याज सवलतीचा निर्णय लवकरच घेऊ. कांदा अनुदानबाबत सकारात्मक विचार करु.
श्री. भुसे म्हणाले, की राज्यव्यापी दौऱ्यास मालेगावपासून सुरुवात केली. आपला आभारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना मालेगावबद्दल विशेष प्रेम हाेते. आपणही ते जोपासले.
यापुर्वी आपण महिला व बाल रूग्णालय दिले. येथे सहा हजार महिलांची प्रसुती व दोन हजार महिलांचे सिझर झाले. हजारो महिलांचा आर्शिवाद तुम्हाला मिळाले. १३० कोटींची रस्ते निधी यासह अनेक विकासाभिमुख निर्णय झाले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्या वडिलांचा फोटो लावू नका असे सांगितले.
त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ते कोणा एकाचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच ते देखील आमचे दैवत आहेत. माझे वडील स्वातंञ्यसैनिक होते. आमच्या आई वडीलांचा उद्धार योग्य नाही. कसमादेच्या विकासासाठी पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी कराव्यात. नार-पार योजनेला मंजुरी द्यावी. मनपा टप्पा दोनसाठी निधी मिळावा.
रिक्षाचालकांसह असंघटित घटकांसाठी महामंडळ करावे. महिला बचत गटांना निधी वाढवून देताना नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत मिळावी. डाळींब, द्राक्ष विशेष पॅकेज द्यावे. कांदा अनुदानाबाबत विचार करावा. मालेगाव जिल्हा निर्मिती करावी असे ते म्हणाले.
श्री. शिंदे व श्री. भुसे जिल्ह्यासंदर्भात बोलत असतानाच सभेतून हजारोच्या जनसमुदायाने एका सुरात जिल्हा, जिल्हा....जिल्हा अशा घोषणा दिल्या. माजीमंत्री गुलाबराव पाटील यांचेही या वेळी भाषण झाले. त्यांनी आम्ही गद्दारी नाही तर उठाव केला आहे. जनता आमच्या पाठीशी आहे असे सांगितले.
जिल्ह्याचा निर्णय लवकरच
मालेगाव जिल्हानिर्मितीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्ह्याचा निर्णय लवकरच घेऊ. दादा व मी दोघांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या बरोबर काम केले आहे. त्यांचे मला ऐकावे लागते.
मुंबई येथे मंत्रालयात आढावा बैठक घेऊन लवकरच जिल्हयाचा निर्णय घेऊ. प्रत्येकालाच हे आपल सरकार आहे असं वाटू लागलं आहे. तुमच्या हक्काचा माणूस व दादा भुसे यांचा मोठा भाऊ मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसलेला आहे याची जाण ठेवा. तुमचे प्रश्न मार्गी लागतील.
मी मुलाखत दिल्यास देशात भुकंप
धर्मवीर या चित्रपटाला १६ पुरस्कार मिळाले. काहींना ते रूचले नाही. आमच्या उठावाची दखल ३३ राष्ट्रांनी घेतली. गद्दार व बंडखोरीचा शिक्का तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला. लोकांनी मात्र आम्हाला प्रेम दिले.
कोणावरही टिका व आरोप करण्याचा माझा स्वभाव नाही. धर्मवीर दिघेंसह विविध प्रश्नांवर मी जेव्हा बोलेल, मुलाखत देईन तेव्हा राज्यातच नव्हे तर देशात भुकंप घडेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.