नाशिक : नाशिकमध्ये बुधवारी घडलेल्या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत, तर कोणी रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी अजूनही धावपळ करत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ठ गमविले आहे, त्यांच्यामागे आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत. या घटनेत कोवळ्या दोन लहान मुलींच्या डोक्यावरील छत्रच हरविले आहे.
आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच
अंबड लिंक रोड परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणारे सुनील झाल्टे (३३, रा. आर्णी, धुळे) यांचाही या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कोवळ्या दोन लहान मुलींच्या डोक्यावरील छत्रच हरविले आहे. यात मोठ्या मुलीचे वय पाच, तर लहान मुलीचे वय अवघे तीन वर्षे आहे. शुक्रवारी (ता. २३) मोठ्या मुलीचा पाचवा वाढदिवस होता. सुनील झाल्टे यांनी वाढदिवशी घरी घेऊन जाण्याची मागणी मेहुणे अविनाश बिऱ्हाडे यांच्याकडे केली होती. मात्र, दोन दिवस अगोदरच मृत्यूने त्यांना कवटाळले. बिऱ्हाडे म्हणाले, की २४ तासांनंतरही अजून सर्व दु:खात आहोत. मुलींना काय घटना घडली आहे, याची कल्पना नाही. आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच असून, समोर दु:खाचा डोंगर उभा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.