अंबासन (जि. नाशिक) : काय सांगावं दादा… रातच्यालाच शेतात मेंढरांच वाघूर घातलया... अन् होत्याच नव्हतं झालया.. अशी केविलवाणी स्थिती अंबासन येथील मेंढपाळांची झाली आहे. तालुक्यात रात्रभर अवकाळी पाऊस आणि वातावरणातील गारठा यामुळे शेकडो जनावरे दगावली आहेत. तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटिल यांनी तातडीने तालुक्यातील मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश देताच घटनास्थळी धाव घेत मंडळ आधिकारी व तलाठी यांनी पंचनामे सुरु केले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बहुतांश शेतक-यांचे मक्याचे पिक काढणी झाल्याने मेंढपाळ वाघूर करून बसले आहेत. मात्र रात्रभर सुरू असलेला अवकाळी पाऊस व हवेतील गारवा मेंढ्यांना मारक ठरला आहे. गावानजीक शिरवाळ नाल्यावर एका शेतात अवकाळी पाऊस व गारठ्यामुळे बऱ्याचशा मेंढ्या मृत झाल्याची चर्चा गावात पसरताच बघ्याची गर्दी जमली होती. रात्रभर मेंढ्यांना गारठ्यापासून उब मिळावी यासाठी काही तरूणांनी शेकोटी पेटवून मेंढ्या वाचविण्यासाठी धडपड केली होती. मात्र काहींचे प्रयत्न असफल राहिल्याचे चित्र होते. बागलाणचे तहसील जितेंद्र इंगळे - पाटिल यांना याबाबत माहिती देतात त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले याप्रमाणेच आधिकारी सी. पी. आहिरे, तलाठी पिनू सोनवणे, कोतवाल देवा पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामे केले. यात जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधीसह, उपनिरीक्षक तुषार भदाणे, निकेश कोळी, नाना पाटिल, हवालदार शिवाजी गुंजाळ, माऊली गायकवाड आदिंनी मेंढपाळांची भेट घेतली. पशुवैद्यकीय आधिकारी उज्वलसिंग पवार यांनी मृत जनावरांवर शवविच्छेदन केले. परिसरात शंभरहून अधिक जनावरे मृत झाल्याचा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.
पशुवैद्यकीय अनावस्था
तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व हवामानातील गारव्यामुळे शंभरहून अधिक जनावरे दगावली याबाबत प्रभारी तालुका पशुवैद्यकीय आधिकारी ऐ.ऐ.खान यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात एकही पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करणारे डाॅक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक जागा रिक्त आहेत. याबाबत प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने शेतक-यांना पैसे खर्चून खाजगी डाॅक्टरांकडून जनावरांवर प्रथमोपचार करीत असल्याची बाब समोर आली आहे.
वीजपुरवठा खंडित
बुधवार (ता.१) रोजी अवकाळी पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर वीज गुल झाल्याने गावात अनेक समस्यांवर नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज पुरवठा खंडित असल्याने गावातील पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. वीज वितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे रात्रभर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
अवकाळी पाऊस व हवामानातील बदलाचा फटका मुक्या जनावरांना बसला आहे. अंबासन येथे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.