इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात तीन वर्षांपासून खरिपाच्या अखेरीस बेमोसमी पाऊस थैमान घालत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गतवर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पिकविमा मिळालेला नाही. त्यातच यंदाही पावसाने नुकसान झाल्याने यंदा तरी पिकविमा मिळेल का? लोकप्रतिनिधी त्यासाठी काही प्रयत्न करणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पीकविम्याची दमडीही मिळाली नाही
गेल्या पंधरवड्यात ऐन दिवाळीत भात कापणी जोरावर असताना बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पुरती धावपळ झाली. शेतातील-खळ्यावरील धान सुरक्षित ठिकाणी साठवतांना शेतकऱ्यांचे नाकी-नऊ आले. पावसामुळे भाताला शेतातच मोड आले होते. खरीप हंगामातील धानाचा पीक विमा काढला होता. शेतकऱ्यांनी पंचनामे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सरसकट नुकसानभरपाई देण्यासाठी शासन दरबारी विनवणी केली. सुज्ञ व शिक्षित शेतकऱ्यांनी पीकविम्याचा अँपवर स्वतः पंचनामा केला. कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आदींनी पंचनामे करून शासनाकडे पूर्तता करून सोपवले. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई अथवा पीकविम्याची दमडीही मिळाली नसल्याची स्थिती आहे. पंचनामे करूनही भरपाई अथवा विमापरतावा मिळत नसेल तर कागदी घोडे नाचवून फायदा तरी काय? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.