Election Year 2024 : राजकारण्यांच्या डोळ्यांत कांदा आणणार पाणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Crop Crisis

Election Year 2024 : राजकारण्यांच्या डोळ्यांत कांदा आणणार पाणी!

नाशिक : ‘इलेक्शन’ वर्ष २०२४ मध्ये राजकारण्यांच्या डोळ्यांत कांदा ‘पाणी' आणणार, हे जवळपास स्पष्ट झाले. अगदी आतापर्यंत उत्पादन वाढल्याने भाव कोसळण्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या बेजार झाले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले.

या साऱ्यांचा परिणाम म्हणजे, केंद्रीय कृषी विभागाच्या अहवालानुसार रब्बी (उन्हाळ) कांद्याच्या क्षेत्रात घट झाल्याने उन्हाळच्या उत्पादनात जवळपास २४ लाख टनांनी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले. (Indications of fall in summer onion production by 2 half lakh tonnes election year 2024 nashik news)

केंद्रीय कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा उन्हाळ कांद्याची देशात दहा लाख २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कांद्याची लागवड ११ लाख ६६ हजार हेक्टरवर झाली होती. राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात सहा लाख हेक्टरवर, तर यंदा पाच लाख ४५ हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे.

मुळातच, यंदा कमी क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असली, तरीही एकरी उत्पादकता चांगली राहील, असे आडाखे कृषितज्ज्ञांनी बांधले होते. त्यावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पाणी फिरवल्याने गेल्या वर्षी इतके उत्पादन मिळेल की नाही, याबद्दलची चिंता सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे.

‘इलेक्शन’ वर्ष २०२४ चा विचार करताना शेतकरी एक बाब अधोरेखित करताहेत ती म्हणजे, फेब्रुवारीचा अपवाद वगळता वर्षभरातील ११ महिने उन्हाळ कांदा साथ देत आला आहे. पूर्वी देशात खरिपामध्ये लेट खरिपासह ४० टक्के आणि उन्हाळ-रब्बी हंगामामध्ये ६० टक्के कांद्याचे उत्पादन व्हायचे.

मात्र पावसाळ्यात कांद्याला फटका बसतो आणि चाळीतील कांद्याला भाव मिळत नसल्याने रब्बी-उन्हाळचे क्षेत्र हळूहळू ७५ टक्क्यांवर पोचले आहे. यंदा खरीप, लेट खरीप कांद्याचे नुकसान पावसाने केले आहे.

त्यात महाराष्ट्रासह जानेवारी ते मार्चमधील लेट खरिपाच्या राजस्थानमधील शेखावती भागातील नागोर, सिक्कर, चिरुसह जोधपूर, गुजरातमधील भावनगर, महुआ, मध्य प्रदेशातील खंडवा, उत्तर कर्नाटक, पश्‍चिम बंगालमधील सुखसागरचा समावेश आहे. ही सारी परिस्थिती पाहता, उन्हाळ कांद्यानंतर खरीप आणि लेट खरीपमधील कांद्याच्या लागवडीसाठी पैशांच्या अभावामुळे किती शेतकरी पुढे येतील, याबद्दलची साशंकता शेतकऱ्यांशी झालेल्या संवादातून पुढे आली आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

गेल्या वर्षी ३१२ लाख टन

देशामध्ये २०२१-२२ मध्ये फलोत्पादनाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार १९ लाख १४ हजार हेक्टरवर तीनही हंगामात कांद्याची लागवड झाली होती आणि ३१२ लाख टनाचे उत्पादन मिळाले होते.

त्यात देशातील प्रमुख पाच राज्यांतील वर्षभरात लागवड झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात त्या राज्यात मिळालेले कांद्याचे उत्पादन टनामध्ये दर्शवते) : गुजरात- एक लाख (२५ लाख), कर्नाटक- दोन लाख ३१ हजार (२७ लाख), मध्य प्रदेश- एक लाख ९६ हजार (४७ लाख), महाराष्ट्र- नऊ लाख २५ हजार (१३३ लाख), बिहार- ५८ हजार (१३ लाख). गेल्या वर्षी देशात उन्हाळ कांद्याचे २२९ लाख टन उत्पादन मिळाले होते.

यंदाच्या लागवड झालेल्या क्षेत्राशी गेल्या वर्षीच्या उत्पादकतेच्या आधारे २०५ लाख टनापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. त्यावरून यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात देशात घट होणार, हे दिसते. दरम्यान, खरिपातील कांदा लेट खरिपामध्ये आणल्याने फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर कांद्याच्या भावात उत्पादन कमी असूनही घसरण झाली आहे.

देशातील कांदा उत्पादनाची स्थिती (२०१९-२० मधील सरकारी नोंदी)

राज्य जिल्ह्यांची संख्या उत्पादकता (हेक्टरी टन)

आंध्र प्रदेश १० २१.६३
आसाम २७ १०.९०
बिहार ३८ १३.३५
गुजरात २९ २९.१५
हिमाचल प्रदेश १० ७.४१
जम्मू-काश्मीर ११ २.३०
कर्नाटक २७ ९.३३
मध्य प्रदेश ५१ २४.५६
मेघालय १० ८.९८
ओडिसा २९ १२.४५
पाँडेचेरी १ ५
राजस्थान ३३ १७.४३
तमिळनाडू २८ ७.७५
तेलंगणा ३१ १०.४१
उत्तर प्रदेश ७५ १५.४९
उत्तराखंड १३ १६.१८
महाराष्ट्र ३० २०

"केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार एप्रिल २२ ते जानेवारी २३ या कालावधीत १९ लाख ८० हजार ७७८ टन कांदा निर्यात झाली. थोडक्यात, २.२ लाख टन दरमहा निर्यातीचा सर्वसाधारण वेग राहिला. आता एप्रिल २०२३ पासून पुढे दरमहा निर्यातीचा वेग कसा राहातो, याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे." - दीपक चव्हाण, शेती बाजारपेठेचे अभ्यासक, पुणे