आपल्याकडे लग्न हा सध्याच्या काळात मोठा सामाजिक विषय बनला आहे. मुलांना मुली मिळत नाहीत आणि मुलींना अपेक्षित स्थळ मिळत नाहीत. काही व्यवसायांच्या बाबतीत तर ही परिस्थिती अधिक बिकट बनत जाते. हे व्यवसाय म्हणजे पोलिस, पत्रकार आणि वकील.
या क्षेत्रातील लोकांना लग्नासाठी मुली मिळण्याची अडचण असते. जशा मुली मिळत नाहीत, तसे या क्षेत्रातील लोकांना कर्ज मिळण्यासही मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. हीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात घर भाड्याने मिळण्याबाबतही दिसून येते. या तिन्ही क्षेत्रांतील लोकांना खूप माहिती काढल्यानंतर घरं भाड्यानी मिळतात.
पण यातील वकिलांचा मुली मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची ग्वाही खुद्द देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. अर्थात ही मिश्किल टिप्पणी होती, पण त्यातील आशय निश्चितपणे महत्त्वाचा ठरला. वकील क्षेत्राबाबत ही परिस्थिती पूर्वी होती; पण आता वकिलांकडे खूप काम असल्याने परिस्थिती बदलली आहे, असे त्यांना म्हणायचे होते.
न्यायामूर्तींच्या या वाक्याला गुरुदक्षिणा सभागृहात जमलेल्या तरुण विशेषतः अविवाहित मंडळींनी जोरदार दाद दिली. चला एक गोष्ट तर नक्कीच घडू पाहतेय, तीन क्षेत्रांपैकी एक क्षेत्रावरचे विवाहाचे संकट दूर होऊन वकिलांना चांगले दिवस आलेले आहेत. अन्य क्षेत्रांनाही हीच स्थिती यावी, अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही. (nashik sakal special chalta bolta marathi news)
होऊद्या अभ्यास
काही व्यक्तींना अभ्यास करण्याची भारी हाऊस असते; पण या अभ्यासाच्या नादात वेळेचा दुरुपयोग होतो आणि हीच गोष्ट कधी कधी अंगलटही येते. त्याचे झाले असे, की २०१८ पासून काही मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या; परंतु त्यांची पूर्तता अजूनही झाली नाही म्हणून थेट रस्त्यावरच उतरण्याची वेळ लोकांवर आली.
तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री महोदय अजून अभ्यासच करत आहेत, असे उत्तर देण्यात आले. चार वर्षे झाले, दोन वेळा आंदोलनही झाली पण अजून मंत्री अभ्यासच करत आहेत. त्यामुळे आता त्यांना अभ्यास करत राहू द्या, आपण आंदोलन सुरू ठेवू, अशी भूमिका घेत आंदोलकांनी मंत्र्यांना चिमटा काढला. त्यामुळे अभ्यासातून आता पुढे काय निष्पन्न होते, हेच बघावे लागेल.
अरे, माझेही बिल थकले आहे...
‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत एका युवकाने मुख्यालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. छतावर गेलेल्या युवकाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. तो युवक नेमके कशामुळे आंदोलन करत आहे, याचा उलगडा कोणालाही होत नव्हता.
बघ्यात उभे असलेल्या एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला विचारणा केली. अरे, हा युवक आंदोलन करत आहे. त्यावर दुसऱ्याने सांगितले, की अरे, तो ठेकेदार आहे. त्याचे बिल थकले आहे. हे बिल मिळत नसल्याने तो छतावर जाऊन आंदोलन करत आहे. त्यावर पहिला ठेकेदार म्हणाला, की माझेही बिल थकले आहे. मी काय करू, असे आंदोलन करून बिल निघणार का, असे म्हणत तिथून निघून गेला. (Latest Marathi News)
अॅड. ठाकरे यांचा बोलबाला वाढतोय
अॅड. नितीन ठाकरे हे थोडे अबोल असले तरी बेरकी व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक आहेत, हे आता नाशिक शहरातील अनेकांनी जाणले आहे. नाशिक बार असोसिएशनची निवडणूक जिंकल्यानंतर एका मोठ्या कार्यक्रमाचे त्यांनी केलेले आयोजन सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
दोन सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीश, मुख्य न्यायाधीशांसह तीन उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि देशातील बार कौन्सिलचे मुख्य पदाधिकारी एका मंचावर आले. नाशिक बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे बरेचसे श्रेय त्यांच्याकडे गेले.
कार्यक्रम उत्तम पार पडला. अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळली. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अॅड. ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्या शिरपेचात या कार्यक्रमाने एक तुरा खोवला गेला.
कार्यक्रमाच्या आयोजनाचे शिवधनुष्य ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांच्यासह त्यांनी पेलले. मात्र, याचा राजकीय फायदा ब्रँडिंगच्या अनुषंगाने त्यांना किती मिळेल, याचे उत्तर पुढच्या महिन्याभरात स्पष्ट व्हायला काहीच हरकत नाही. तोपर्यंत निवडणुकाही शिगेला पोचलेल्या असतील. (Latest Marathi News)
यात नेमके अध्यक्ष कोण?
नुकतीच शहरात प्रादेशिक स्तरावरील विद्यार्थी सभा पार पडली. अर्थातच या परिषदेला राज्य अन् राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी हजर होते. यानिमित्त राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर हा माध्यम संवाद नियोजित होता खरा; पण उद्घाटन कार्यक्रम लांबल्याने पत्रकार ग्रीनरूममध्ये प्रतीक्षेत बसलेले होते.
प्रोफेशनल संस्थेचा कार्यक्रम म्हटल्यावर सर्वच सूट-बूटमध्ये होते. अशात एकामागून एक कोटधारी दाखल होत होते अन् प्रत्येक वेळी असा भास व्हायचा, की हेच अध्यक्ष महोदय. चार-सहा वेळा झाल्यानंतर उपस्थितांपैकी एकाने प्रश्न विचारला, ‘अध्यक्ष दिसता तरी कसे, यात नेमके अध्यक्ष कोण’, हा प्रश्न ऐकल्यानंतर उपस्थितांना हसू आवरले नाही अन् कंटाळवाण्या वातावरणातील ताण काहीसा हलका झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.