येवला : येवल्याचा उत्तर-पूर्व भाग म्हणजे जानेवारीनंतरच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होणारा परिसर. मात्र, नियोजन, प्रयोगशीलता आणि कृषी विभागाच्या योजनांसह तंत्रज्ञानाची जोड दिली की शेतीत यशाला पालवी फुटते, हे सिद्ध केले आहे अवर्षणप्रवण देवठाण येथील संदीप पवार या शेतकऱ्याने. एकीकडे प्यायला पाणी नसताना शेततळ्याच्या पाण्यावर या शेतकऱ्याने आद्रक तसेच हिरव्या व लाल मिरचीतून तब्बल १८ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. (Nashik Income of 18 lakhs Ginger Chili by Sandeep Pawar of Desolation Prone Deothan news)
इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आणि आदर्शवत असलेल्या श्री. पवार यांच्या या शेतीचे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड तसेच, मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांनी कौतुक केले आहे. मराठवाड्याच्या लगतचा पूर्व भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कोरडवाहू पिके घेणारा हा भाग असून, आता आठमाही कांदा, कपाशी व मका शेतकऱ्यांचे प्रमुख पीक बनले आहे.
मात्र, त्यातही अल्प पाऊस व घटलेली भूजल पातळी यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरनंतर एक-दोन पाण्यामुळे पिके हातातून जाऊ लागल्याने यावर शेतकऱ्यांनी शेततळ्याचा पर्याय शोधला आहे. अशोक पवार हे कृषी विभागाच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदानातून शेततळे खोदून त्यात प्लास्टिक अस्तरीकरण केले. यातील पाण्याचा उपयोग करून चांगले पीक घेऊन उत्पन्न मिळवू, या हेतूने त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केले.
मागीलवर्षी अल्प पाऊस असला तरी उपलब्ध पाण्यावर त्यांनी शेततळे भरून ठेवले. या पाण्यावरच दुष्काळ असतानाही त्यांनी सहा एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रात हिरव्या मिरचीची ऑगस्टमध्ये, तर दोन एकर क्षेत्रात रेड पेपरीका या लाल मिरचीची लागवड चार फूट बाय सव्वा फूट अंतरावर साधारणत: ऑक्टोबर महिन्यात केली.
माहीम व आरमार वाणाची निवड त्यांनी केली. दुष्काळातही पाण्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतकरी चांगले पैसे मिळवू शकतात हे पवार यांनी दाखवून दिले आहे. या प्रयोगात त्यांना कृषी सहाय्यक संतोष गोसावी, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. (latest marathi news)
असा झाला खर्च
इस्राईल ठिबक : २० हजार
मल्चिंग पेपर : २० हजार, तसेच
रोपे, खते व बुरशीनाशक, मजुरी : चार लाख ५० हजार रुपये
असा मिळाला दर
- १५ टन हिरवी मिरचीचे उत्पादन
- ४० रुपये प्रतिकिलोला दर
- तीन टन लाल मिरचीला २९५ रुपये दर
- माहीम वाणाच्या आद्रकची लागवड
- एकरी दहा टन उत्पादन
- सरासरी ८५ रुपये दर
- खर्च वजा जाता १८ लाख रुपयांचे उत्पन्न
"शेतीत अनेक प्रयोग शक्य आहे. कृषी विभागाकडून अनुदानासोबतच तंत्रज्ञानाचे सल्ले घेऊन त्या पद्धतीने शेतीत वेगळेवेगळे पिके घेतली तर नक्कीच अपेक्षित कृषी विकास साधता येईल. संदीप पवार यांचे उदाहरण इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच आदर्शवत आहे."
- हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी, अंदरसूल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.