Nashik Raj Thackeray : ''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नुकताच नाशिकमध्ये पार पाडला. या वर्धापन दिनाच्या निमित्त राज ठाकरे यांच्याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यासारखे काहीच नव्हते. मात्र यापूर्वी नेहमीच्या शैलीतील सत्तेचा शब्द त्यांनी दिला. विश्वास ठेवा, सत्ता आणणारचं. असे विधान त्यांनी केले. नशिबाने म्हणा किंवा अन्य कारणाने त्यांना आता सत्तेच्या राजकारणात जागा दिसू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी बुडत्याला काडीचा आधारच म्हणावा लागेल.''
(Nashik Raj Thackeray Maharashtra Navnirman Sena Anniversary marathi news)
सन २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर पक्षाने सामाजिक राजकीय आंदोलने हाती घेतली. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मराठीचा मुद्दा तसेच टोलनाक्यांवरील टोळधाड त्यांनी नजरेस आणून देत त्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनाचा परिणाम म्हणून मनसेची ख्याती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचली.
परिणामी राज्यात मनसेचे १२ आमदार निवडून आले. नाशिकबाबत बोलायचे तर सुरवातीला महापालिकेत १२ नगरसेवक, जिल्हा परिषदेचे चार सदस्य त्यानंतर तीन आमदार व पुन्हा महापालिकेत ४० नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले. नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या लाटेवर स्वार होत पाच वर्षे मनसेकडे सत्ता दिली. त्यानंतर सन २०१२ पासून देशभरात मोदी लाट सुरू झाली.
या लाटेत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही वाहून गेला. कदाचित त्याची सल म्हणून ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून राज्यभर मोदी व त्यांच्या सरकारविरोधात प्रचार केला. त्यानंतर मनसेची अवस्था वाईट झाली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभा किंवा पुणे दौरा एवढेचं चर्चेचा विषय राहिले. नाशिक व राज ठाकरे यांच्यातही मोठी संपर्काची पोकळी तयार झाली. (latest marathi news)
राज ठाकरे नाशिक मध्ये आले तरी भाषणातून एवढे कामे करूनही नाशिककरांनी आम्हाला कुठे स्वीकारल्याचे सांगत मनातील सल कायम व्यक्त करतं राहीले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिवसेंदिवस कमी होत गेली. राज्याच्या विधानसभेतही एकमेव आमदार राहिला, अशा परिस्थितीत मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले.
आशादायक बुलावा
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले. दोन विचारांचे पक्ष एक झाले व सत्ता देखील आली. महायुती व महाविकास आघाडीबाबत दोन्हीकडूनही विरोधी विचारांचे सरकार बनले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे या दोघांविरुद्ध अन्य सर्व पक्ष असे वातावरण झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन हात करताना कदाचित ठाकरे नावाची उणीव भासत असेल.
त्यातही मुंबई, ठाणे परिसरात त्याची तीव्रता अधिक असावी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे घराण्यातील राज यांना हात देण्यात आला असावा. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा मिळतील किंवा विधानसभेत मनसेला किती जागा मिळतील, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. मात्र सत्तेत सहभागी करून घेण्याची मानसिकता महायुतीत निर्माण झाल्याची बाब मनसैनिकांना प्रकर्षाने जाणवल्याने आशेचा एक नवा किरण पक्षात निर्माण झाला.
राजकारणात कधी काहीही होऊ शकते. आजचे वैरी उद्याचे मित्र व आजचे मित्र उद्याचे वैरी देखील होऊ शकतात. राजकारणाचा हा नियम येथे तंतोतंत मनसेच्या महायुतीतील प्रवेशाच्या चर्चेतून लागू होतो. राज ठाकरे यांच्या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींमुळे मनसेला नवसंजीवनी मिळणार आहे.
ठाकरेंना ठाकरेंच्या शैलीत उत्तर देण्यासाठी भाजपचे हे राजकारण कदाचित कामाला येईल, नाही तर चांगले नाही बोलले तरी चालेल पण विरोधात तरी बोलू नये, अशी भूमिका कदाचित भाजपची असावी. त्यातूनच विविध राजकीय पक्षांचे कडबोळे पाठीवर घेऊन जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मनसेची आवश्यकता वाटली. भाजपला याचा किती फायदा होईल, हे येणारा काळाच ठरवेल. मात्र मनसेसाठी बुडत्याला काडीचा आधार मात्र जरूर मिळाला, एवढे नक्की म्हणता येईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.