नाशिककरांचा पलटवार : टीका दुर्दैवी, तीन व्यक्तींमध्ये संमेलन अशक्य

marathi sahitya sammelan
marathi sahitya sammelanesakal

नाशिक : येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) लोकवर्गणीतून साधेपणाने न होता, संमेलनाचा इव्हेंट करण्यात आला. तसेच नाशिककर आयोजकांनी दिलेले शब्द फिरवले अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी केली होती. त्यावर नाशिककरांनी पलटवार करताना, मराठी साहित्य महामंडळ आणि कौतीकराव ठाले पाटील यांच्या कार्यशैलीतच एकाधिकारशाही असून, तीन व्यक्तींमध्ये संमेलन होवू शकत नसल्याचे म्हटले आहे.

आमची भूमिका कार्यकर्त्यांची

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अधिसूचनेनुसार संमेलनाचे संयोजक, स्वागत समिती काम करत असते. ठाले पाटील यांच्या सूचनेनुसारच संमेलनाचे कामकाज सुरू होते. चाळीस समित्यांमधील रात्रंदिवस राबणारे हात असो, की औरंगाबादला संमेलनाच्या कामकाजाविषयी दौरे करणे असो, हे महामंडळाच्या आदेशाचे पालन करणेच होते. कोरोना (Corona) काळात संमेलनाचे नियोजन करण्यात आले. संमेलनाच्या संपूर्ण कामकाजात आमची भूमिका कार्यकर्त्यांची असल्याचे श्री. जातेगावकर यांनी नमूद केले.

marathi sahitya sammelan
नाशिकच्या साहित्य संमेलनाला ठाले-पाटलांनी ठोकले

''नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे लोकवर्गणी, लोकसहभाग कमी दिसून येत आहे. संमेलनाच्या हिशेबात काही देणग्या येणे बाकी आहेत. तसेच, जीएसटी, टीडीएस परताव्याला वेळ लागत असल्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात हिशेब मांडला जाणार आहे. संमेलनात प्रत्येक निर्णय महामंडळाच्या अनुमतीनेच घेतला आहे. संमेलनात राजकीय व्यक्ती होते; परंतू संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी केला नाही. तीन व्यक्तींमध्ये संमेलन न होता सामान्य व्यक्तींनीही संमेलनात मोठी हजेरी लावली. याशिवाय २५ लाख लोकांनी संमेलन ऑनलाइन बघितले.'' - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक

''साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ठाले पाटील यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, स्वागतसमितीवर केलेले आरोप अन्यायकारक आहेत. स्वागत समिती महामंडळाच्या सूचना, धोरणांची अंमलबजावणी करते. मात्र, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य समितीला नसते. त्यामुळे अशा आरोपांना अर्थ राहात नाही. कोरोनाच्या परिस्थितीत संमेलन पार पडले. नाशिककरांचे कोरोनाकाळातले प्रयत्न महामंडळाने अदखलपात्र ठरविले आहेत. संमेलन उत्सवासारखेच झाले आहे. महामंडळाच्या कार्यशैलीतच एकाधिकारशाही असून, स्वागत समितीवर महामंडळाचे टोकाचे नियंत्रण असते.'' - उत्तम कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक

''महाराष्ट्रात राजकीय व्यक्तींना साहित्यात रूची असणे, यात काही वावगे नाही. संमेलनं भव्यदिव्यच व्हायला हवीत. मात्र, विभागीय संमेलनही वाढायला हवीत. संमेलनाच्या पत्रिकेतील नावं, दिग्गज साहित्यिक अनुपस्थितीत राहतात. महामंडळाने असे आरोप न करता तरूणांची सांस्कृतिक जडणघडण कशी होइल याकडे लक्ष द्यावे.'' - प्रकाश होळकर, कवी

marathi sahitya sammelan
नाशिक : वारली पेंटींगद्वारे चिमुकल्यांनी रंगविल्या घरांच्या भिंती

''नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनाबाबत महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी असे आरोप करणे दुर्दैवी आहे. कोरोनामुळे लोकसहभाग कमी झाला. संमेलनात राजकीय व्यक्तींचा सहभाग असणे, यात चूकीचे काहीच वाटत नाही. ठाले पाटील यांनी संयोजकांची बाजू समजून घेत टीका करावी.'' - हेमंत टकले, कार्याध्यक्ष

''कोरोनाच्या विविध निर्बंधांमुळे लोकवर्गणी, सहभाग कमी राहिला. लोकसहभाग वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. लोकांकडे कोरोनामुळे पैसे नसल्याने राजाश्रय घ्यावा लागला. ठाले पाटीलांचे संयोजकांवरील आरोप खेदजनक आहेत.'' - सुभाष पाटील, कार्यवाह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com