Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रद्वेषी आहेत. त्यांना पाय ठेवू देऊ नका म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र द्वेषींच्या मांडीला मांडी लावून बसले असून, हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज ठाकरे यांच्या कृतीबद्दल प्रबोधनकार ठाकरे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला यातना होत असतील, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. (Nashik Sanjay Raut)
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार राऊत नाशिकमध्ये आले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत मशिदीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचे फतवे काढले जात असतील, तर महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असा फतवा मी हिंदूंना काढतो, असे व्यक्त केले होते.
त्यावर टीका करताना खासदार राऊत यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख न करता काही नेते, पक्षांची दखल महाराष्ट्राने घ्यावी, अशी त्यांची स्थिती राहिली नसल्याचे सांगितले. ‘देशात संविधान वाचविण्याची मोठी लढाई सुरू आहे. सर्व धर्माचे लोक संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहे. मतपेटीतून त्यांना परिवर्तन पाहिजे. त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील.
तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठाकरेंनी जीवन समर्पित केले. त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी चाल करून येणाऱ्या व्यक्तींना मदत करून इच्छित असेल. (latest marathi news)
तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा स्वस्थ बसणार नाही. मोदी यांनी महाराष्ट्रात कितीही सभा घेतल्या, तरी परिवर्तन अटळ आहे. मोदींची शारीरिक व मानसिक स्थिती बरी नसल्याने घरी न बसल्यास लोक त्यांना घरी बसवतील, असा दावा केला.
केजरीवाल मविआच्या सभेत
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देताना न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. केजरीवाल १७ मेस मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या समारोपाच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. मोदी मोठ्या प्रमाणात सभा घेत असल्याने यावरून त्यांचा पराभव दिसून येतो.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३०-४० जागा जिंकेल, असा दावा राऊत यांनी केला. नाशिककर गद्दारांना थारा देणार नाहीत. त्यामुळे शिंदे सेनेचे हेमंत गोडसे तिसऱ्या क्रमांकावर राहतील, असा दावाही त्यांनी केला. विजय करंजकर यांनी तिकीट दिले नाही म्हणून पक्ष सोडला; परंतु विधान परिषदेसाठी आमदार म्हणून त्यांचे नाव दिले, त्या वेळी देखील त्यांना विचारले नव्हते. विधान परिषदेसाठी त्यांचे नाव देणे हे चूक होते असे आता म्हणावे लागेल, असे राऊत म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.