येवला : आपल्या लेकीचा नवरा नोकरीवालाच पाहिजे किंबहुना लाखात, दोन अंकी पगार घेणारा पाहिजे, अशी सर्वच बापाची व्याख्या झाली आहे. मात्र, आपला मुलगा किती कमावतो, हा विचार होत नाही, या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी येथील तरुणांनी बाजारात अनोखी फलकबाजी करत ‘स्वतःच्या मुलाला १२ हजार पगार आणि जावई पाहिजे साठ हजार पगाराचा. वा रे दुनिया’, अशी फलकबाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आणि परिस्थितीचे गांभीर्य मांडले. (Nashik young people display mentality of parents about marriage at yeola market news)
बदलत्या जीवनशैलीमुळे वडील अन् मुलींच्या अपेक्षा वाढल्याने सर्वसामान्य शेतकरी आणि अल्प पगारी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे महाकठीण झाले आहे. शेती करणाऱ्या मुलगा असेल, तर मुली साफ नकार देत असल्याने नवीन समस्या तयार झाली आहे. आता मुलींना हुंडा देऊन लग्न करण्याची वेळ मुलांवर आली आहे.
त्यातही मुलगा नोकरीवाला अन् सुस्थापित असेल, तर मुलींचे आईवडिल लग्नाला तयार होतात. किती एकर शेती आहे आणि त्यातून किती उत्पन्न येते, याचा अजिबात विचार केला जात नाही. शहरात नोकरी आणि खोली असेल, तर अशा मुलाला ताबडतोब होकार मिळतो. कुठलीही नोकरी असली, तरी ती सरकारी पाहिजे, ही मानसिकता वाढत आहे.
आता आयटी आणि अभियांत्रिकी सेक्टरची चलती असून, नोकरीची जागा पॅकेजने घेतली आहे. ५० हजार, लाखाच्या आसपास पगार असेल, तर जावई पसंत पडतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधत उपरोधितपणे परिस्थितीचे वर्णन करत ही व्यथा येथील तरुण स्वामी गिरे याने हातात फलक घेऊन मांडली. (latest marathi news)
‘स्वतःचा मुलगा १२ हजार रुपये पगाराने दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातो. मात्र, जावई पाहिजे ६० हजार पगाराचा. वा रे दुनिया..!’, अशा आशियाचा मजकूर लिहिलेला फलक स्वामी गिरे, त्याचे मित्र सौरव शेलार व समीर नायडू यांनी मंगळवारी (ता. २६) बाजारात फिरून विवाह इच्छुक तरुणांची व्यथा मांडली.
हा अनोखा फलक पाहण्यासाठी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली होती. कुणाला हे विशेष वाटत होते, तर कोणी वास्तविकता मांडली, म्हणून स्वामी गिरीचे धन्यवाद मानत होते. मात्र, या फलकातून स्वामीने बाजारात केलेली जनजागृती अनेकांना भावली, हे मात्र नक्की!
"मुलीचे लग्न ठरले, की सरकारी नोकरीवाला, चांगल्या पॅकेजवाला, ६० हजाराच्या वर पगारवाला जावई पाहिजे, अशी अपेक्षा धरली जाते. हातावरच्या तरुणाला मुलगी मिळणे कठीण झाले असून, दहा-बारा हजार पगार घेणाऱ्याचाही लग्नासाठी विचार होत नाही. अशा तरुणांनी काय करायचे, हाच सवाल आहे. स्वतःच्या मुलाला नोकरी नसेल किंवा दहा-बारा हजार पगार असेल, तरी त्याचा विचार होत नाही. मात्र, जावई लाखभर पगारवाला पाहिजे, हे वास्तव तयार होत चालले आहे. त्यामुळे या पद्धतीने समाजाची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला."
-स्वामी गिरे, येवला
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.