शेतकऱ्यांच्या दणक्‍याने कांदा निर्यातबंदी उठविल्याची अधिसूचना...15 मार्चपासून निर्यात सुरू 

onion strike.jpg
onion strike.jpg

नाशिक : केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी ट्‌विटद्वारे कांदा निर्यातबंदी उठवल्याची खूशखबर शेतकऱ्यांना दिली. पण, प्रत्यक्षात अधिसूचना जारी होत नसल्याने लिलाव बंद पाडण्यापासून रास्ता रोको आंदोलनाचा दणका सोमवारी (ता.2) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिल्यावर त्याची धग दिल्लीत पोचली अन्‌ पाच दिवसांनंतर अखेर अधिसूचना केंद्राने जारी केली. कांद्याची निर्यात 15 मार्चपासून खुली होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने निर्यातीसाठी कुठल्याही अटी-शर्थी लागू केलेल्या नाहीत. 

अटी-शर्थींना फाटा; 15 मार्चपासून निर्यात सुरू 
कांदा निर्यातबंदी उठवल्याचे श्री. पासवान यांनी 26 फेब्रुवारीला जाहीर करताच दुसऱ्या दिवशी कांद्याच्या भावात क्विंटलमागे लासलगावमध्ये चारशे, तर पिंपळगावमध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली. मात्र 48 तास झाले, तरीही अधिसूचना जारी होत नाही म्हटल्यावर भाव शंभर ते साडेतीनशे रुपयांनी गडगडले. त्यामुळे स्वाभाविकपणे शेतकऱ्यांमधील संताप वाढीस लागला होता. अधिसूचनेअभावी क्विंटलला 600 ते 700 रुपयांनी सोमवारपर्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांचा पारा चढला. देवळा, सटाणा, येवला, अंदरसूल, मनमाड, उमराणे, मुंगसे, पिंपळगाव, लासलगाव येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. तसेच सटाण्यात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या सुरात सूर मिसळत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रालाच "घरचा आहेर' दिला.

आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोचले.

येवल्यात बाजार समितीसमोर रास्ता रोको करण्यात आले. अंदरसूलला नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कांदे ओतले, तर मनमाडला इंदूर-पुणे महामार्गावर, उमराणेला मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. लासलगावला संतप्त शेतकऱ्यांनी दोन दिवसांत कांदा निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना जारी न झाल्यास रेल्वे आणि रास्ता रोको आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोचले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कांदा निर्यातबंदी उठेपर्यंत संयम बाळगावा, असे शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केंद्रावर उद्योगपतींचे हित जोपसले जात असल्याचा आरोप केला. 

 
भारतीय कांद्याला मिळेल पसंती 
पाकिस्तानने 30 मेपर्यंत कांदा निर्यातबंदी जाहीर केली आहे. चीन कोरोनाग्रस्त असल्याने कांद्याच्या "शीपमेंट'ला म्हणावा तसा वेग नाही. तुर्कस्तान आणि इजिप्तचा कांदा मेमध्ये बाजारात येईल. अशा साऱ्या जागतिक परिस्थितीत सध्या हॉलंड, सुदान, ऑस्ट्रेलियाचा कांदा विकला जात आहे. आता भारतीय कांदा जगाच्या बाजारपेठेत पोचणार असल्याने तुटलेले ग्राहक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सप्टेंबर 2019 मध्ये केंद्राने कांदा निर्यातबंदी केली होती. देशात जानेवारीअखेरपर्यंतच्या लागवडीनुसार 34 टक्‍क्‍यांनी अधिक उत्पादन अपेक्षित आहे. उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असल्याने अतिरिक्त कांद्याचे प्रमाण वाढणार आहे. हीच बाब श्री. पासवान यांनी ट्‌विटमध्ये मान्य केली होती. त्यांच्या मंत्रालयाने कांदा निर्यातबंदी उठवण्यास "हिरवा कंदील' दाखवला होता. मात्र वाणिज्य मंत्रालयात फाइल अडकली होती. 


"सकाळ'च्या वृत्ताला सकारात्मक प्रतिसाद 
पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर करूनही त्यासंबंधीची अधिसूचना जारी होत नसल्याने पतपत्र, किमान निर्यातमूल्य दर, कोटा पद्धतीचा अवलंब केंद्राकडून केला जाण्याची शंका उपस्थित केली होती. त्यासंबंधीचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यास वाणिज्य मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पतपत्र, किमान निर्यातमूल्य अशा अटीविना निर्यात खुली होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

केंद्राने 15 ऐवजी 10 मार्चला निर्यात खुली करण्याचा पुनर्विचार

केंद्राने निर्यात खुली होण्याचा दिवस निश्‍चित केला आहे. त्यामुळे तोपर्यंत शेतकरी कांदा बाजारात आणण्याची घाई करणार नाही. तसेच आणखी बाजारभाव कोसळण्याची आता शक्‍यता नाही. याशिवाय मार्चएंडसाठी सात ते दहा दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून केंद्राने 15 ऐवजी 10 मार्चला निर्यात खुली करण्याचा पुनर्विचार करायला हवा. - विकास सिंह, कांदा निर्यातदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com