
Traffic Problem : रविवार कारंजा चौकात रिक्षाचालकांची मुजोरी! भररस्त्यात रिक्षा थांबविल्याने कोंडी
जुने नाशिक : रविवार कारंजा चौक ते बोहरपट्टी कॉर्नर येथे रिक्षावाल्यांची प्रचंड मुजोरी वाढली आहे. परिसरातील अनधिकृत रिक्षा थांब्याने बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक, तसेच व्यावसायिक त्रस्त झाले आहे.
भररस्त्यात आणि दुकानांसमोर रिक्षा थांबवून प्रवासी भरत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (raviwar Karanja Chowk by rickshaw drivers Confusion due to stopping of rickshaws make Traffic Problem nashik news)
मेनरोड बाजारपेठ जाणारा मुख्य रस्त्यावर रविवार कारंजा आणि बोहरपट्टी कॉर्नर परिसरात रिक्षाचालकांकडून अनधिकृत रिक्षाथांबा केला आहे. रविवार कारंजा चौकात गणेश मंदिरासमोर मोठ्या प्रमाणावर भररस्त्यात रिक्षा थांबवून अतिक्रमण केले जाते.
त्यामुळे अन्य वाहने आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. वेड्यावाकड्या स्वरूपात रिक्षा उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
व्यावसायिकांकडून मज्जाव केला असता, त्यांच्याशी वाद घातला जातो. बहुतांश वेळेस वादाचे रूपांतर मारहाणीत होते. इतकेच नव्हे तर अन्य वाहने वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असताना किरकोळ स्वरूपाचे अपघातदेखील होतात.
अशा वेळेस त्या रिक्षाचालकांकडून अन्य वाहनधारकांना तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत वाद घालून मारहाण केली जाते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी नकार दिला तरी रिक्षात बसण्याची जबरदस्ती केली जाते. अशा वेळेस आपल्याच रिक्षात प्रवासी बसावे. यासाठी रिक्षा चालकांमध्ये चढाओढ सुरू असते. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपाला जात असतो.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
नागरिकांवर अरेरावी
तरुणींना पाहून नको ते हावभाव करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला जातो. अहिल्याबाई होळकर पूल यशवंत मंडई आणि सिद्धिविनायक चांदीच्या गणपती समोर अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.
वाहतूक पोलिस नियुक्त आहे, त्यांच्याकडून रिक्षाचालकांना आवरणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात. रिक्षाचालकांची मनमानी अधिकच वाढून त्यांच्याकडून भररस्त्यात रिक्षा थांबा केला जातो.
या ठिकाणी अतिरिक्त पोलिस नियुक्त करून अनधिकृत रिक्षा थांबा हटविण्यात यावा. अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक आणि नागरिक करीत आहे.