मालेगाव शहर : शहरातील स्वच्छतेबाबत सातत्याने ओरड होत असते. दरम्यान नव्यानेच आलेल्या आयुक्त राजेश जाधव यांनी स्वच्छता व साफसफाई बाबत प्रकर्षाने मोहीम हाती घेतली.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून 'घंटागाडी' शहरातील अनेक भागातील नागरी वसाहतींना 'बाय बाय टाटा' करत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. (Shivaji Road College Road area Ghantagadi problem Dissatisfaction of citizens regarding cleanliness Nashik News)
स्वच्छतेबाबत मालेगाव शहरात सातत्याने ओरड होत असते. असे असताना देखील याकडे मनपा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने याठिकाणी असलेल्या मोकळ्या भूखंडावरच कचरा टाकला जात असल्याने असल्याने विविध साथींचे आजार बळावून रोगराई पसरण्याची भीती वाढत आहे.
घंटागाडी दररोज तर येतच नाही. पण आलीच तर महिन्यातून एखाद्या वेळेस येते. त्यामुळे अनेकदा परिसरातील लोक रस्त्यावरच टाकत असल्याचे चित्र दिसत आहे.
यातच घंटागाडीतील लोक रस्त्यावर पडलेला कचरा उचलत नाहीत संबंधित निरीक्षकाकडे तक्रार केली असता ते म्हणतात की ते ठेकेदाराची माणसे आहेत. आम्ही त्यांना सांगतो परंतु ते ऐकत नाहीत अशा प्रकारे उत्तरे मिळतात.
कॅम्प विभागासाठी १७ कामगार
संपूर्ण कॅम्प परिसरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी अवघी १७ कामगार कार्यरत असून यातील अनेक कर्मचारी हे साप्ताहिक सुट्टी, रजा, आजारपण आदी कारणामुळे गैरहजर राहतात. या संपूर्ण परिसरासाठी किमान १०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.
परिसरातील कॉलेज रोड ते रावळगाव नाक्यापर्यंत सर्वत्र प्रचंड अतिक्रमण वाढले आहे. वाढलेल्या अतिक्रमण व अडगळीचा फायदा कचरा व घाणीसाठी होतो. कॉलेज व कॅम्प रोडने दररोज १० हजारांहून अधिक विद्यार्थी वापरतात. कॅम्प भागातील अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पडलेला असतो.
या घाणीवर भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा उच्छाद रोजचाच झाला आहे. घंटागाडीच टाटा बाय बाय करत असेल तर स्वच्छतेचे काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.
"कॅम्प परिसरच काय सगळीकडे स्वच्छतेबाबत उदासीनता दिसून येते.ठेका असलेली घंटागाडी ठेंगा दाखवते. नियमितता नसल्याने कचरा साचतो.नागरिक अडगळीच्या जागा व मोकळ्या ठिकाणी घाण टाकतात.घंटागाडी नियमित यावी. स्वच्छता कर्मचारी वाढवून साफसफाई करण्यात यावी."- विवेक पाटील, अध्यक्ष, मालेगाव नागरिक संघटना
"स्वच्छतेबाबत महापालिका आरोग्य विभाग बेफिकीर आहे. घंटागाडीसह साफसफाई होत नाही. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. काही परिसरात साथ रोग अधूनमधून सुरू असतात. फवारणीसह स्वच्छतेची काळजी घ्यावी."
- सविता अहिरे, गृहिणी, वर्धमान नगर