मालेगाव (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे मका व कापूस पिकाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने व हात उसनवार असलेल्या कर्जाला कंटाळून देवारपाडे (ता. मालेगाव) येथील शिवाजी दशरथ सरोदे (वय ५५) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी (ता.७) दुपारी हा प्रकार घडला. शेतकरी आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरोदे यांची अवघी दीड हेक्टर जिरायती शेती आहे. यात त्यांनी खरीपाचे कापूस लागवड व मका पेरणी केली. पीक काढणीवर आले असताना माळमाथ्यावर गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उत्पादन येण्याची खात्रीही नव्हती. सरोदे आज दुपारी शेतावर चक्कर मारुन आले. शेतात साचलेले पाणी व पिकाची स्थिती पाहून ते हवालदील झाले. खरीपाचा हक्काचा घास हिरावला गेल्याने हात उसनवार असलेल्या कर्जाच्या चिंतेतून त्यांनी घरी येत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. देवारपाडे येथील तलाठी यांनी या घटनेची नाेंद घेत तहसिलदार व संबंधितांना शेतकरी खातेदाराने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल पाठवला आहे. तथापि श्री. सरोदे यांच्या नावावर दीड एकर शेती असून सातबारा उताऱ्यावर विकास संस्था अथवा बँकेचे कर्ज नाही. तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.